400 Year Old Natural AC: भीषण उन्हाळा सुरू आहे, बाहेर गरम हवेच्या तीव्र लाटा वाहत आहेत आणि अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात आपण घरात किंवा ऑफिसमध्ये लगेच एसी सुरू करतो. पण जरा विचार करा, आजपासून तब्बल 400 वर्षांपूर्वी जेव्हा विजेचा शोधही लागला नव्हता, तेव्हा राजे-महाराजे या कडक उन्हाळ्यात स्वतःला कसे थंड ठेवत असतील?
कोणत्याही विजेविना आणि आधुनिक मशिनरीशिवाय निसर्गाच्या नियमांचा वापर करून शिमलासारखी थंड हवा देणारा एक राजेशाही महाल आजही अस्तित्वात आहे. याची थक्क करणारी विज्ञानावर आधारित इंजिनिअरिंग पाहून आजचे मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि आर्किटेक्ट्स देखील डोक्याला हात लावतात.
विजेशिवाय चालणारे हे जगातील अनोखे 'नॅचरल एसी' पाहायला मिळते ते राजस्थानची राजधानी जयपूर येथील ऐतिहासिक आमेर किल्ल्यामध्ये. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या किल्ल्यात एक विशेष खोली आहे, ज्याला 'सुख निवास' म्हणून ओळखले जाते.
Photo Credit: NDTV Reporter
आजच्या काळात जेव्हा आपण कडक उन्हाळ्याचा सामना करत आहोत, तेव्हा पुरातत्व विभागाने पर्यटकांसाठी हे 400 वर्षे जुने कूलिंग सिस्टम पुन्हा एकदा सुरू केले आहे. कछवाहा शासक राजा मानसिंह प्रथम यांनी हे सुख निवास बांधले होते, ज्याची डागडुजी नंतर मिर्झा राजा जयसिंह यांनी केली.
( नक्की वाचा : Car Insurance Claim : ..तर थेट बँक खात्यात जमा होतील पैसे; कारवर झाड पडल्यास 'हे' काम करायला विसरू नका )
मावठा तलावाचे पाणी आणि वाऱ्याचे अप्रतिम विज्ञान
या महालात विजेविना थंड हवा मिळण्यामागे पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. महालाच्या छतावर एक मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे, ज्यामध्ये खाली असलेल्या मावठा तलावातून पाणी चढवले जायचे. यानंतर, पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा लक्षात घेऊन, हे पाणी संगमरवरी दगडांच्या बारीक नाल्यांमधून कारंज्याच्या स्वरूपात खाली सोडले जायचे. जेव्हा बाहेरची गरम हवा या वाहत्या पाण्यावरून प्रवास करायची, तेव्हा ती लगेच थंड व्हायची आणि खोलीत एसीसारखा गारवा निर्माण करायची.
( नक्की वाचा : Monsoon Home Care: पावसाळ्यात घराच्या भिंतींना ओल आलीय? खिशातला एकही रुपया खर्च न करता 'अशी' मिळवा सुटका )
चंदनाचे दरवाजे आणि जाड भिंतींची कमाल
सुख निवासच्या प्रवेशद्वारावर चंदनाचे नक्षीकाम केलेले दरवाजे बसवण्यात आले आहेत. हे चंदनाचे लाकूड खोलीतील गारवा बाहेर जाऊ देत नाही. तसेच, पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे या चंदनाचा मंद आणि सुगंधी सुवास संपूर्ण खोलीत पसरतो. या महालाच्या भिंती चुना आणि संगमरवरी दगडांच्या मिश्रणाने अतिशय जाड बनवल्या आहेत, ज्यामुळे बाहेरची उष्णता आत येत नाही. महालाच्या अरुंद खिडक्या हवेचा दाब वाढवून खोलीत नैसर्गिक कूलिंग इफेक्ट तयार करतात.
पर्यटकांना खास पर्वणी
पुरातत्व विभागाने अनेक वर्षांपासून बंद असलेले सुख निवास आणि शीश महालातील हे कारंजे आता पर्यटकांसाठी पुन्हा सुरू केले आहेत. आमेर महालाचे अधीक्षक राकेश छोलक यांनी सांगितले की, पूर्वी जे सिस्टम पूर्णपणे मानवी श्रमावर चालायचे, तिथे आता एक विशेष यंत्रणा तयार करून ते पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. जेणेकरून देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना त्या काळातील राजेशाही थाट आणि विजेविना जगले जाणारे आरामदायी जीवन जवळून अनुभवता येईल. यासोबतच चारबाग शैलीतील बागेतील कारंजेही सुरू करण्यात आले आहेत.
Photo Credit: NDTV Reporter
हिमाचल प्रदेशातून फिरण्यासाठी आलेल्या नेहा बिंद्रा या पर्यटकाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, बाहेर भयानक उन्हाळा आहे, पण सुख निवासमध्ये पाऊल ठेवताच शरीराला प्रचंड आराम मिळतो. 400 वर्षे जुनी ही भारतीय तंत्रज्ञान आजच्या महागड्या एअर कंडिशनरपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सुख निवास हे पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण केंद्र बनले आहे. या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने 160 होमगार्ड आणि 50 फायर सेफ्टी गार्ड्स अशा 200 पेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात केले आहे.