Scorpion Poison : विंचवाचा धोका हा फक्त खेड्यात किंवा डोंगराळ भागात असल्याचा सार्वत्रिक समज आहे. पण, शहरांमध्ये विंचू चावल्याची उदाहरणं समोर आली आहेत. विशेषतः पावसाळ्यात घरांच्या आसपास अनेक प्राणी, कीटर येतात. त्यामध्ये विंचूही घरात येण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीला विंचू चावला तर त्यावर तातडीनं उपाय करणे आवश्यक असते. अन्यथा विंचवाचे विष शरिरात भिनल्यानंतर त्याचा गंभीर परिणाम होण्याची भिती असते. विंचू चावल्यानंतर त्याचे विष तातडीनं कसे उतरवावे, त्यावेळी कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?
जिवा आयुर्वेदचे संचालक आणि वरिष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. प्रताप चौहान यांनी याबाबत 'NDTV' शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉ. चौहान यांनी सांगितले की, विंचवाचे विष हे जीवघेणे नसले तरी, त्यामुळे जळजळ, सूज, तीव्र वेदना आणि काहीवेळा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे विंचू चावल्यानंतर तातडीनं योग्य पावलं उचलणे आवश्यक आहे. विष शरीरात पसरु नये आणि लवकर आराम मिळावा यासाठी हे उपाय करणे आवश्यक आहे.
सर्वात आधी काय करावे?
- डॉ. प्रताप चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, विंचू चावल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीला स्थिर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे विष शरीरात वेगानं पसरत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीनं चालणे तसेच फिरणे टाळावे.
- चावलेली जागा कोमट पाण्याने हलक्या हाताने धुवावी जेणेकरून कोणताही बाह्य संसर्ग होऊ नये.
- यानंतर तुम्ही एक आयुर्वेदिक उपाय वापरू शकता. यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून चावलेल्या जागेवर लावा. तुळशीमध्ये नैसर्गिक विषहरण गुणधर्म असतात, जे जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
- याशिवाय, बारीक वाटलेली हळद आणि मोहरीचे तेल मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. यामुळे देखील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
डॉ. प्रताप चौहान यांनी विंचू चावल्यानंतर काय काळजी घ्यावी हे देखील सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विंचू चावल्यानंतर तीव्र ताप, उलट्या किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर अजिबात उशीर करू नका. अशा परिस्थितीत, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
( नक्की वाचा: Health Tips: भूक लागल्यानंतर राग आणि चिडचिड का होते? जाणून घ्या सविस्तर )
कोणत्या चुका टाळाव्यात?
अनेकदा लोकं विंचू चावल्यानंतर घाबरून झाड-फूक किंवा गरम सळ्या लावणे यांसारखे उपाय करतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. विष शोषून घेण्याचा प्रयत्न करणे देखील धोकादायक ठरू शकते. अशा घरगुती उपायांपासून दूर राहावे, असे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक आयुर्वेदिक मदतीसोबतच तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा, असं त्यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला विंचू चावला असेल तर घाबरू नका, तर शांतपणे वागा. आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत जे सुरुवातीच्या लक्षणांमध्ये आराम देऊ शकतात, पण गंभीर परिस्थितीत वैद्यकीय मदत आवश्यक आहे. योग्य माहिती आणि सतर्कता हेच विषावरील सर्वात प्रभावी उपचार आहे.
स्पष्टीकरण: या बातमीतील मजकूर सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा तसंच तज्ज्ञांचा सल्ला नेहमी घ्यावा. NDTV नेटवर्क या माहितीसाठी जबाबदार असल्याचा दावा करत नाही.