Marathi Bhasha Gaurav Din : 27 फेब्रुवारी आणि मराठी भाषा गौरव दिनाचे नेमके काय आहे कनेक्शन? वाचा सविस्तर

Marathi Bhasha Gaurav Din : जगभरातील मराठी भाषकांसाठी 27 फेब्रुवारी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि उत्साहाचा असतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरव दिन आणि 27 फेब्रुवारीचे कनेक्शन माहिती आहे का?
मुंबई:

Marathi Bhasha Gaurav Din : जगभरातील मराठी भाषकांसाठी 27 फेब्रुवारी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि उत्साहाचा असतो. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे या दिवशी मायबोलीचा जयजयकार केला जातो. 

हा दिवस केवळ एका भाषेचा उत्सव नसून तो मराठी संस्कृती, तिचा समृद्ध इतिहास आणि साहित्याचा गौरव करण्याचा सोहळा आहे. आपली मायबोली पुढच्या पिढीपर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

कुसुमाग्रज आणि मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास

या दिवसाचे खास महत्त्व म्हणजे मराठी साहित्यातील दिग्गज कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे. कुसुमाग्रज यांनी आपल्या लेखणीने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या अफाट कार्याला आणि स्मृतीला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 

या निर्णयानुसार कुसुमाग्रज यांची जयंती हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर 2014 सालापासून अधिकृतपणे हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. कुसुमाग्रज हे केवळ कवी नव्हते, तर ते एक प्रगल्भ नाटककार, कादंबरीकार आणि समीक्षक देखील होते.

Advertisement

( नक्की वाचा : काय असतो अभिजात भाषा ठरण्याचा निकष? कोणत्या निकषावर मिळाला मराठीला बहुमान ? )
 

जागतिक स्तरावर मराठी भाषेचा वाढता दबदबा

मराठी ही केवळ महाराष्ट्राची भाषा नसून ती भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. आकडेवारीनुसार, जगभरात 83 दशलक्षांहून अधिक लोक मराठी बोलतात. भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत मराठी अग्रस्थानी आहे. मराठी भाषेचे सौंदर्य तिच्या वैविध्यपूर्ण बोलींमध्ये दडलेले आहे. 

एकूण 42 बोली भाषांमध्ये विभागलेली मराठी, वैदर्भी, झाडी बोली, कोकणी आणि खान्देशी अशा विविध रूपांत कानावर पडते. या भाषेचे व्याकरण आणि मूळ हे प्राकृत तसेच पाली या प्राचीन भाषांशी जोडलेले आहे, ज्यामुळे तिला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

Advertisement

असा साजरा होतो मराठी भाषेचा उत्सव

हा दिवस साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये जय्यत तयारी केली जाते. मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि काव्यवाचनाचे आयोजन करून त्यांना मराठी साहित्याची गोडी लावली जाते. केवळ भारतातच नाही, तर सातासमुद्रापार असलेल्या देशांमध्येही मराठी बांधव पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुका काढतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांपासून सुरू झालेला हा भाषेचा प्रवास आजही तितकाच प्रवाही आहे. आपल्या भाषेचा आदर करणे आणि तिचा वापर वाढवणे हेच या दिवसाचे खरे फलित मानले जाते.