Ahmedabad Plane Crash: १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (AI171) बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा (फ्लाइट १७१) अत्यंत भीषण अपघात झाला होता. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ३२ सेकंदात विमान मेघानीनगर परिसरातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि १२ क्रू मेंबरसह एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता.
आम्हाला न्याय द्या.. प्रीतम पवार यांची विनंती
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात सांगोल्याच्या आशा पवार व महादेव पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्च्यात त्यांचे दोन्ही मूलगे शैलेश व रमेश पवार हे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्या अपघाताचा निष्पक्ष पणे तपास व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्या सुनबाई प्रीतम पवार यांनी केली आहे.
आपल्या सासू सासऱ्यांच्या आठवणी सांगताना प्रीतम पवार यांनी म्हणाल्या की, एका वर्षापूर्वी अहमदाबाद विमान अपघातात माझे सासू सासरे गेले. विमान अपघातावेळी माझ्या पप्पांनी घातलेली माळ आजही तशीच आहे. एक वर्ष झालं आजपर्यंत आमच्या हातात या अपघाताचा रिपोर्ट मिळालेला नाही. आम्हाला लोक म्हणतात की ते त्यांच्या नशीबात होतं. मात्र हे नशीबात नव्हतं. एयर इंडिया आणि बोईंगच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली.
न जळालेल्या भगवद्गगीतेची मन सुन्न करणारी कहाणी
पुढे बोलताना प्रीतम पवार यांनी विमान अपघातात न जळालेल्या भगवदगीतेमागची मन सुन्न करणारी कहाणी सांगितली. "हा अपघात होण्याच्या तीन महिने आधी श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले होते. त्यांच्या हातात सुदर्शन चक्र होतं. भगवान श्रीकृष्ण माझ्या का स्वप्नात आले? असा मला प्रश्न पडला. त्यामुळेच मी भगवद्गीता मागवली. मी माझ्या आईला सांगितल्यानंतर माझ्या सासूबाई गुजरातहून ती भगवद्गगीता घेऊन येत होत्या. मात्र दुर्दैवाने ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही. एयर इंडियाला याबाबत अनेक पत्रे लिहिली मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मला कळालं की कृष्णांना मला काय सांगायचं होते,"
तसेच "हे १२ महिने आम्ही कसे काढले त्या भावना व्यक्त करु शकत नाही. आम्हा सर्वांना एकच उत्तर पाहिजे हा विमान अपघात का झाला? हा अपघात युकेमध्ये झाला असता तर आत्तापर्यंत त्याचा निकाल लागला असता, मात्र भारतामध्ये अपघाच झाल्यानेच सत्य समोर येत नाही. जे कोणी हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करत आहेत त्यांना आमची हात जोडून विनंती आहे, आम्हाला न्याय द्या," अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
"मी माझ्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदाच भेटणार होते. त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र अनर्थ घडला, ज्या मेणबत्त्या आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आणलेल्या त्या त्यांच्या श्रद्धांजलीसाठी वापरल्या. आम्ही कोणत्या स्थितीतून गेलोय याची तुम्ही कल्पना करु शकता. प्लीज मोदीजी आम्हाला न्याय द्या," अशी विनंती प्रीतम पवार यांनी केली आहे.