योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुकमध्ये काही शाळकरी मुलांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद'अशी घोषणाबाजी केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळे हिवरखेड पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणाचं सत्य उघड झालं आहे.
काय होता नेमका दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी मुले अंदाजे 5 ते 7 वर्षांची होती. त्यामुळे या व्हिडिओतील घोषणांचा नेमका अर्थ आणि त्यामागील सत्यता तपासणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
पोलिसांनी सुरुवातीला गावात आणि संबंधित शाळेत जाऊन प्राथमिक माहिती गोळा केली. यानंतर, व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली.
( नक्की वाचा : Akola News : एका चिमुरडीसाठी अख्खे गाव एकवटले; निवडणुकीच्या गोंधळात घडणार होता भयंकर प्रकार! नेमकं काय घडलं? )
काय झाला खुलासा?
पोलिसांनी व्हिडिओची बारकाईने पाहणी केली असता, मुले खरं तर ‘पाकिस्तान जिंदाबाद' नव्हे, तर ‘बहादुरखान जिंदाबाद' असे म्हणत असल्याचे स्पष्ट झाले. तपासासाठी जेव्हा पोलिसांनी शाळेत जाऊन या मुलांची चौकशी केली, तेव्हा या घटनेमागील सत्य समोर आले.
मुलांनी सांगितले की, त्यांच्या एका मित्राच्या आजोबांचे नाव बहादुर खान आहे. दररोज याच मित्राला चिडवण्यासाठी ही मुले त्याच्या नावाचा जयजयकार करत घोषणा देत असत. ही घोषणाबाजी त्याच 'चिडवण्याच्या' खेळाचा एक भाग होती. गावातील नागरिकांनीही कोणत्याही प्रकारची देशविरोधी घोषणाबाजी झाली नसल्याचे स्पष्टपणे नाकारले. व्हिडिओमध्ये घोषणा देणाऱ्या मुलांच्या मागे एक मुलगा चिडून पळताना दिसत होता, यावरूनही हा प्रकार शाळकरी मुलांचा परस्परांमधील वाद किंवा खेळ असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांचा इशारा
सखोल तपास पूर्ण झाल्यानंतर हिवरखेड पोलिसांनी हे स्पष्ट केले की, अडगाव बुद्रुक गावात कोणत्याही प्रकारची देशविरोधी घोषणाबाजी झालेली नाही. हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून किंवा गैरसमजातून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
पोलिसांनी नागरिकांना कठोर आवाहन केले आहे की, अशा व्हिडिओंचा गैरवापर करून समाजात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. अफवा पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.