मयुर बोरसे, पंढरपूर:
Ashadhi Ekadashi 2026: "तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली; जरी बाप साऱ्या जगाचा, परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली.." चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने आज सुवर्णनगरी पंढरी दुमदुमून गेली आहे. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय महापूजा पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सौभाग्यवती अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. या महापुजेला मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचे वारकरी म्हणून बसण्याचा बहुमान दिला जातो. यंदा धाराशिवच्या माने दांपत्याला हा मान मिळाला. "आम्ही २० वर्षांपासून वारी करतोय,आमच्या कुटुंबात वारी करणारी ही तिसरी पिढी आहे. मानाच्या वारकरी होण्याचा मान मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हते. यंदा हा मान मिळाला" अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
20 वर्ष पंढरीची वारी... धाराशिवच्या दांपत्याला पुजेचा मान!!!
लाखो भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल- रखुमाईची महापूजा पार पडली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असलेल्या बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने यांना मिळाला. साक्षात विठुरायाच्या पुजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतर्थ झाले, अशी भावना या दांपत्याने यावेळी व्यक्त केली.
बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने हे दांपत्य शेती करतात, दोघेही 20 वर्षांपासून पंढरीची वारी करतात. बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने यांना १ मुलगा, चार मुली आणि आठ नातवंडे असा मोठा परिवार आहे. 20 वर्ष मनोभावी पंढरीची वारी केली. यावर्षी त्यांना विठुरायाच्या पुजेचा मान मिळाला. त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला.