अमरावती: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसह एकूण 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांचं गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे. 8 जूनपासून त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर रोष व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'कृषिमंत्री वातावरण पेटवू नका, लोकांचा अंत पाहू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन काय मार्ग काढला ते सांगा? बच्चू कडूच मरण बघायचा आहे का तुम्हाला? आम्ही शिवाजी राजेंचे वंशज म्हणायचे, रयतेचे राजे म्हणायचे. आम्ही जर लक्ष दिले नाही तर आमचा काय उपयोग? असे म्हणत बच्चू कडूंप्रमाणे आम्हीही आंदोलनाला बसतो, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. बच्चू कडूंच्या उपोषणाची सरकारने पाचव्या दिवशीही दखल न घेतल्यामुळे छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडू यांनी उपचारासही नकार दिल्याने कार्यकर्तेही चिंतेत आहेत. त्यामुळेच बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली जात आहे. काँग्रेसचे नेते डॉ.सुनील देशमुख, डॉ.नयना कडू, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडून बच्चू कडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बच्चू कडू सलाईन घेणार नसल्याच्या भूमिकेत ठाम आहेत.
नक्की वाचा - Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट
दरम्यान, कलेक्टर दुजाभाव करत आहेत. आम्ही विषमतेविरुद्ध लढतोय. तुम्ही इथे विषमता करत आहात. तुम्ही अधिकारी आहात हे विसरून जाणार असा आक्रमक पवित्रा घेत बच्चू कडूंनी गुरुवारी (ता.12) उपोषणाच्या पाचव्या दिवशी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना चांगलंच फटकारले. बच्चू कडूंची प्रकृती खालावत जात आहे. कार्यकर्त्यांकडून बच्चू कडूंना सलाईन घेण्याची विनंती केली जाते. तर दुसरीकडे बच्चू कडूंच्या उपोषणात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची प्रॉपर वैद्यकीय तपासणी न झाल्याने बच्चू कडू कलेक्टरला चांगलाच फटकारलं.