Mumbai Local New Train Fake MSG: प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारपासून १५ डब्यांच्या १० नवीन फेऱ्या सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कल्याण, बदलापूर, कर्जत आणि कसारा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका बनावट परिपत्रकाने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.
दिवा, डोंबिवली आणि स्थानकांवर उतरता येणार नाही? परिपत्रक VIRAL
व्हायरल झालेल्या या कथित परिपत्रकात असा दावा करण्यात आला होता की, या नवीन १५ डब्यांच्या लोकल ट्रेनमधून दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावर प्रवाशांना उतरण्यास बंदी आहे. या स्थानकांवर केवळ चढण्यासाठी परवानगी असून, उतरल्यास रेल्वे पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. यावर मध्य रेल्वेचा लोगो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी असल्याने प्रवाशांनी या माहितीवर विश्वास ठेवला होता. याबाबत आता मध्य रेल्वेने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
Central Railway: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वेवर 7 वर्षानंतर मोठा बदल; प्रवास होणार सुखकर
रेल्वेकडून स्पष्टीकरण!
व्हायरल होत असलेल्या पोस्टची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे परिपत्रक पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारे आहे. रेल्वेने अशा कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातलेले नाहीत. प्रवाशांना या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, हे खोटी माहिती पसरवणारे परिपत्रक कोणी तयार केले आणि ते समाजमाध्यमांवर कोणी व्हायरल केले, याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका, अशी सूचनाही रेल्वे प्रशासनाने केली आहे.