Unesco world heritage site : महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचं स्मरण करताना प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानानं फुलून येते. युनायटेड नेशन्सच्या युनस्को या जागतिक संघटनेनं देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दिला आहे. शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
कोणत्या किल्ल्यांचा समावेश?
युनस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा 12 किल्ल्यांचा समावेश आहे. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष आहेत. हे किल्ले म्हणजे
राजगड
प्रतापगड
पन्हाळा
शिवनेरी
लोहगड
साल्हेर
सिंधुदुर्ग
विजयदुर्ग
सुवर्णदुर्ग
खांदेरी
जिंजी (तामिळनाडू)
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, '' मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
(नक्की वाचा : Devendra Fadnavis: धर्मांतरानंतर आरक्षण घेणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा )
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य' आहे.''
देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय.