मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूरच्या नांदणीमधील महादेवी मठातील माधुरी हत्तीणची वनतारामध्ये रवानगी करण्यात आली आहे. मात्र याला नांदणीसह सर्व कोल्हापुरकरांचा जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. नांदणीमध्ये माधुरीला परत आणण्यासाठी समस्त कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी आता राज्य सरकारनेही पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
काय म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, अशी माहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
तसेच या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.