Devgiri Fort Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावरून ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर एक मोठा वाद निर्माण झाला आहे. देवगिरी किल्ल्यावर महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तिथल्या सुरक्षा रक्षकाने काठी उगारल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर या गार्डच्या वर्तणुकीवर तीव्र टीका केली जात आहे.
महाराजांच्या जयघोषाला विरोध
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक देवगिरी किल्ला हा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. यादव काळापासून या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. याच किल्ल्याच्या परिसरात काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. या घोषणेनंतर तिथे तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने या विद्यार्थ्यांना मज्जाव केला. व्हायरल व्हिडिओमध्ये मधील दाव्यानुसार, घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिशेने गार्डने काठी उगारली आणि त्यांना घोषणाबाजी थांबवण्यास सांगितले.
(नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वाद
या घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाने सुरक्षा रक्षकाला जाब विचारला की, शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देण्यास इथे परवानगी नाही का? त्यावर त्या गार्डने तिथे लावलेल्या फलकाकडे बोट दाखवत उत्तर दिले की, इथे घोषणाबाजी करण्यास परवानगी नाही, तुम्हाला घोषणा द्यायची असेल तर बाहेर जाऊन द्या. या उत्तरामुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले. तुम्ही भारतात राहता की पाकिस्तानमध्ये, असा संतप्त सवालही व्हिडिओ काढणाऱ्यांनी विचारला. मात्र, तो गार्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. तुम्ही हा व्हिडिओ जाऊन दाखवा असं आव्हानही या गार्डनं दिलं.
सोशल मीडियावर उमटले तीव्र पडसाद
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून नेटिझन्सनी यावर संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या मातीत आणि त्यातही एका ऐतिहासिक किल्ल्यावर महाराजांचा जयघोष करण्यापासून रोखले जाणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक युजर्सनी या गार्डवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : खळबळजनक! छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते; भाजपच्या बड्या मंत्र्याचे सुरतमध्ये वक्तव्य )
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि त्यामागील पूर्ण सत्य काय आहे, याची पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. 'NDTV मराठी' या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
देवगिरी किल्ल्याचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. अशा ठिकाणी शिवरायांचे नाव घेण्यावरून वाद होणे हे पर्यटकांच्या मनाला लागणारे ठरले आहे. पुरातत्व विभागाचे नियम आणि लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सध्या या प्रकारणाची प्रशासन चौकशी करुन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.