ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv ZP Election 2026: डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबीयांना सोडलं तर दुसऱ्या कोणाला अक्कल नाही ? बाकी सगळे बिन आकली आहेत अशा तीव्र शब्दांत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारण ही एका घराची मक्तेदारी नसावी, नेते मंडळीच्या नातेवाईकांनाच तिकीट देण्याची पद्धत योग्य नाही,असं स्पष्ट मत ओमराजे निंबाळकर यांनी मांडले.
ओमराजेंची राणा पाटील यांच्यावर टीका
भाजपने नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट न देण्याचा घेतलेला निर्णय आपल्याला आवडल्याचं सांगत, बसवराज पाटील यांनी स्वतःच्या मुलाला उमेदवारी न दिल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं. इकडेही सांगण्यात आलं होतं, पण “मला यांची नियती आणि नियत माहिती आहे,” असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच हे सुरू आल्याचे अधोरेखित करत तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय असा सवालही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.
दरम्यान, अर्चना पाटील यांनी तेर आणि केशेगाव या दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा असतानाच त्यांनी अचानक केवळ एकाच गटातून अर्ज मागे घेत, तेर गटातून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबीयांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हल्लाबोल केल्याने राजकीय वातावरण तापले असून त्याला अर्चना पाटील काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्र्यांनी विकासकामे अडवल्याचा आरोप
दुसरीकडे, धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी आपण शिफारस केलेली सर्वसामान्य जनतेची विकासकामे जाणीवपूर्वक अडवल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला.
“जनतेची कामे करायची नसतील तर तसे स्पष्ट सांगा. मी गावोगावी जाऊन ते वाचून दाखवतो,” असा इशारा दिल्यानंतर अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपण शिफारस केलेली सर्व कामे मंजूर केल्याचा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. कमळाबाई आणि बाणाच्या राजकीय संघर्षात जिल्हा नियोजन समितीतील मागील दोन वर्षांतील ५७५ कोटी रुपयांच्या विकासकामांवर लावलेली स्थगिती आपल्यामुळेच उठवण्यात आली, असाही दावा त्यांनी केला.