Khed ZP School: वारे गुरुजींनी करुन दाखवलं! खेडमधील झेडपी शाळेचा जगात डंका; काय आहे खास?

आमच्या मुलांचं आयुष्य बदललयं, आम्हाला अभिमान वाटतो की आमचं गाव जगभर ओळखलं जातंय, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, प्रतिनिधी:

Khed  Jalindar Village ZP School: एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.  ही शाळा कोणत्याही शहरातील नाही, गावातीलही नाही, तर एका छोट्याशा वस्तीवरची आहे. पण आश्चर्य म्हणजे ही शाळा थेट जगातील टॉप टेन शाळांमध्ये पोहोचली आहे, आणि हे शक्य केलं एका शिक्षकाने. खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकेकाळी गावाच्या बाहेर असलेली, कुणालाही माहित नसलेली ही शाळा, आज तालुका, जिल्हा, राज्य नव्हे, तर थेट जगात पोहोचली आहे. कसं ते जाणून घ्या..

खेड तालुक्यातील (Khed) जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मोठे यश मिळवले आहे. जिल्हा परिषद शाळा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण जालिंदरनगरची ही शाळा आणि इथले विद्यार्थी पाहून राज्यातील इतर शाळांनी आणि गावकऱ्यांनी देखील प्रेरणा घ्यावी, जेणेकरून प्रत्येक गावात मुलांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळू शकेल.

 T4 एज्युकेशन या जागतिक संस्थेच्या World's Best School Competition मध्ये, लोकसहभागातून शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या श्रेणीत जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये या शाळेची निवड झाली आहे. 2022 मध्ये येथे रुजू झाले दत्तात्रय वारे गुरूजी यांच्या प्रयत्नांनी हे दैदिप्यमान यश मिळाले आहे. 

Himachal Pradesh : एका कुत्र्याच्या पिल्लाने वाचवले 67 गावकऱ्यांचे प्राण, अन्यथा माळीणसारखी दुर्घटना घडली असती

एक शिक्षक किती बदल घडवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे दत्तात्रय वारे. याआधी शिरूर तालुक्यात वाबळेवाडी येथे त्यांनी झिरो एनर्जी शाळा घडवली होती, आणि आता जालिंदरनगर शाळेला थेट जागतिक दर्जाची ओळख मिळवून दिली. या शाळेत मुलांना २२ वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिलं जातं. भारताच्या विविध राज्यातील भाषांबरोबरच जर्मन, जपानी, नेपाळी, इंग्रजी भाषांचे ज्ञान इथे मुलांना मिळतं. हे विद्यार्थी या भाषा फक्त शिकत नाहीत, तर वाचतात, लिहितात आणि बोलतातही.

लवकरच ऑनलाईन मतदान प्रक्रियेद्वारे या शाळेला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी आणि निवडली गेलेली ही पहिलीच सरकारी शाळा आहे. शाळेच्या या यशाचे श्रेय गावकऱ्यांनीही वारे गुरुजींना दिले आहे. आमच्या मुलांचं आयुष्य बदललयं, आम्हाला अभिमान वाटतो की आमचं गाव जगभर ओळखलं जातंय, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

Advertisement

'मराठी'साठी एल्गार! मनसेचे पुन्हा खळखट्ट्याक; राज्यभरातून मनसैनिक मुंबईत धडकणार

तसेच आम्ही खूप आनंदी आहोत, आम्ही इंग्लिश, जर्मन, नेपाळी, जपानी भाषा शिकत आहोत. गुरूजींमुळे आम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.आम्हाला मोठं व्हायचंय, जगात नाव करायचंय, असं विद्यार्थी म्हणत आहेत. गुरूजींनी खूप मेहनत घेतली, आम्हाला देखील साथ द्यायला अभिमान वाटतो, अशाही भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्यात.