विशाल पुजारी, कोल्हापूर: महायुती सरकारने नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. या महामार्गाविरोधात अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या असून शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्वेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवल्याचा प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संभाव्य शक्तिपीठ महामार्गात अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब हटविण्याच्या दृष्टीने महावितरणने सर्व्हे सुरू केला आहे. या सर्वेसाठी आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना केनवडे येथील शेतकऱ्यांनी पकडून जाब विचारला. खेबवडे येथून व्हनाळी, केनवडेपर्यंत खांबाचा सर्व्हे करणार होते. यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन हा सर्व्हे आपण थांबवत असल्याचे सांगत विषयावर पडदा पाडला. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत हा सर्व्हे पूर्णतः बंद करा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या विभागीय मेळाव्यात करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा पार पडला.
या मेळाव्यात शेतकरी व कष्टकरयांच्या विविध प्रश्नांवर लढा उभारण्याबरोबर नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.या मेळाव्याला आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह सांगली, कोल्हापूर,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.