Kolhapur International Cricket Stadium : कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेत एक सुवर्ण पान जोडले गेले असून शहरात जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक प्रकल्पासाठी सामंजस्य करार पार पडला. क्रीडा विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) यांच्यात झालेल्या या करारामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंना आता जागतिक पातळीवरील सोयी-सुविधा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
कसे असेल क्रिकेटचे स्टेडियम?
या भव्य प्रकल्पासाठी करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील 12.76 हेक्टर म्हणजेच तब्बल 31.90 एकर शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे भाडेपट्ट्याने हस्तांतरित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी या करारनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )
याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बीसीसीआय (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या सर्व आधुनिक निकषांनुसार हे स्टेडियम उभारले जाणार आहे. यामध्ये सुमारे 35 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था असेल. यासोबतच अत्याधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट्स, खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी भव्य वाहनतळ, सौर ऊर्जा प्रकल्प आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे एक खास क्रिकेट म्युझियमही साकारले जाणार आहे.
केवळ क्रिकेटच नाही, तर उभारणार मल्टी स्पोर्ट्स हब
विशेष म्हणजे हे मैदान केवळ क्रिकेटपुरते मर्यादित न राहता एक पूर्ण 'मल्टी स्पोर्ट्स हब' म्हणून विकसित केले जाणार आहे. येथे कुस्ती, जलतरण, बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, टेबल टेनिस आणि फेन्सिंग यांसारख्या विविध खेळांसाठीही अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार असून क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.