रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगद्याला गळती लागल्याचे समोर आले आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईसाठी हा बोगदा तयार करण्यात आला होता. मात्र पावसाळा सुरु होताच या बोगद्याला गळती लागल्याने या कामाच्या दर्जाबाबत सवाल उपस्थित होत आहेत. बोगद्याच्या सिमेंट फेसिंगमधून पाणी पडत असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नक्की वाचा - Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागातील पाणीपुरवठा 11 तास बंद !
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या अलीकडे दरड कोसळली होती. डोंगराचा काही भाग थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पर्यायी मार्ग बंद असल्यामुळे दरड कोसळल्या मार्गावरूनच दोन्ही दिशेची वाहतूक संथ गतीने सुरू झाली होती. याचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.
अशातच आता कशेडी घाटातील बोगद्यालाही गळती लागल्याचे समोर आले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं बोगद्यात गळती सुरु झाली असून पावासामुळे बोगद्यातील गळती वाढल्याची शक्यता आहे. बोगद्यात पाणी गळत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दरम्यान, 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी कोकणात जाताना चाकरमान्यांची सोय व्हावी म्हणून 1 मे रोजी कशेडी बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन महिन्यात त्याला गळती लागली होती. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवल्याने या बोगद्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.