विशाल पुजारी, कोल्हापूर: गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मान्सूनच्या एन्ट्रीनंतर पहिल्याच पावसात मुंबई तुंबली असून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस कोसळत आहे. कोल्हापूरमध्येही गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची संतातधार आहे. पुढचे पाच दिवस जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहर आणि इतर काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाहतुकीस अडथळा देखील निर्माण होत आहे.
पावसाचं प्रमाण वाढत असल्याने प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. हवामान विभागाकडून 29 मेपर्यंत कोल्हापुरात यलो अलर्ट आणि घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या 36 तासांत कोल्हापूर शहर व घाट परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.