Maharashtra Rain: राज्यात मॉन्सूनसध्या राज्यातील बहुतांश भागांत उन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून, यादरम्यान पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी हजेरी लावत आहेत. मात्र, हा विश्रांतीचा काळ तूर्तास तरी संपला असून हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा पाडाव पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
आज कुठे कुठे पावसाच्या सरी बरसणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बीकानेर, दिल्ली, लखनऊ आणि पाटणा मार्गे मणिपूरपर्यंत विस्तारलेला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून सुमारे ०.९ किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय असल्यामुळे मान्सूनच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. परिणामी, कोकण आणि विदर्भासह प्रमुख घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी राज्यातील घाटमाथ्यावरील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही जिल्ह्यांच्या घाट परिसरासाठी हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सातही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या जिल्ह्यांनाही उद्यासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
दुसरीकडे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत जरी कोणताही अधिकृत हवामान अलर्ट जारी करण्यात आला नसला, तरी स्थानिक हवामानानुसार या भागांत दिवसभरात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा हा जोर केवळ मंगळवारीच नव्हे, तर बुधवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. बुधवारी देखील विदर्भातील वरील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.