ZP Election 2026 : तुमचं एक मत ठरणार गावाचा विकास; जिल्हा परिषदेच्या मतदानाची A to Z माहिती वाचा एका क्लिकवर

Maharashtra ZP Election 2026: राज्यातील  12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
ZP Election 2026: या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी मतदान होत आहे.
मुंबई:

Maharashtra ZP Election 2026: राज्यातील  12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय दुखवट्यानंतर मतदानाची ही नवी तारीख निश्चित करण्यात आली असून शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदार आपला हक्क बजावू शकणार आहेत.

निवडणुकीचे रणांगण आणि उमेदवारांची संख्या

या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. 

विशेष म्हणजे महिलांसाठी राखीव असलेल्या जागांची संख्या मोठी असून जिल्हा परिषदेत 369 आणि पंचायत समित्यांमध्ये 731 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीही आरक्षित जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

( नक्की वाचा : ZP Election 2026 : 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींची तारीख बदलली; मतदान कधी? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर )

मतदानाची वेळ आणि निकालाची तारीख

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये शनिवारी मतदान पार पडणार आहे. 

Advertisement

मतदानासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (9 फेब्रुवारी 2026) रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर निकाल जाहीर होतील आणि आचारसंहिता संपुष्टात येईल.

( नक्की वाचा : Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा )

2 कोटींहून अधिक मतदार ठरवणार भवितव्य

या निवडणुकीत राज्यातील 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला कौल देणार आहेत. यामध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष आणि 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 468 इतर मतदारही मतदानाचा हक्क बजावतील.

Advertisement

मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाने 25471 मतदान केंद्रे उभारली असून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 1 लाख 28 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 125 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 125 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा ताफा तैनात असेल.

दोन मते कशी द्यावीत आणि ईव्हीएमची रचना

प्रत्येक मतदाराला या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद गटासाठी आणि दुसरे मत पंचायत समिती गणासाठी असेल. जिल्हा परिषद उमेदवारासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल, तर पंचायत समितीसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ईव्हीएमवर पाहायला मिळेल. 

Advertisement

या प्रक्रियेसाठी आयोगाने 51537 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदारांसाठी डिजिटल सुविधा आणि खास सोयी

मतदारांना आपले नाव आणि केंद्र शोधणे सोपे जावे यासाठी आयोगाने मताधिकार (Matadhikar) नावाचे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. तसेच mahasecvoterlist.in या वेबसाईटवरही नाव शोधता येणार आहे. 

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांना रांगेत न थांबता प्राधान्य दिले जाईल. त्यांच्यासाठी रॅम्प, व्हिलचेअर, पिण्याचे पाणी, सावली आणि शौचालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या गावाच्या विकासाचा पाया असतात. आपल्या भागाच्या उन्नतीसाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून आपला बहुमोल हक्क बजावावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.
 

Topics mentioned in this article