'तुम्ही जिवंत असेपर्यंत भाजपची एकही सीट निवडून आणू नका'

जरांगे यावरच थांबले नाहीत तर हक्काचे 40 ते 50 मराठा आमदार विधानसभेत गेले पाहीजेत असेही ते म्हणाले. त्या तयारीलाही आता आपण लागणार आहोत असे ते म्हणाले.

Advertisement
Read Time: 3 mins
जालना:

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण पुन्हा एकदा स्थगित केले आहे. शिवाय आरक्षण देण्याबाबत सरकारला नवे अल्टिमेटम ही दिले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे.त्यामुळे महायुतीतल्या भाजपचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे. तुम्ही जिवंत असेपर्यंत भाजपची एकही सीट निवडून आणू नका असे थेट आवाहनच त्यांनी समाजाला केले आहे. जरांगे यावरच थांबले नाहीत तर हक्काचे 40 ते 50 मराठा आमदार विधानसभेत गेले पाहीजेत असेही ते म्हणाले. त्या तयारीलाही आता आपण लागणार आहोत असे ते म्हणाले. शिवाय कोणाला पाडायचे याचा ही निर्णय घेवू असेही त्यांनी स्पष्ट केले. 

'भाजपचा एकही निवडून देवू नका' 

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्थगिती देताना भाजपचे टेन्शन वाढवले आहे. त्यांनी संपुर्ण मराठा समाजाला आवाहन केले आहे, की  भाजपची एकही सीट तुम्ही जिवंत आहे, तो पर्यंत निवडून आणू नका. भाजप संपत चालले आहेत. त्याला जबाबदर फडणवीस आणि त्यांचे दोन चार लोक आहेत असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला आहे. मला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पण मी मेलो तरी चालेल पण भाजपचा एकही उमेदवार निवडून देवू नका असे त्यांनी जाहीर पणे सांगितले. 

'50 जण हक्काचे विधानसभेत पाठवणार'  

सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही. त्या पेक्षा मैदानात उतरलेलं कधीही चांगले. त्यामुळे उपोषण स्थगित करीत आहे. शिवाय कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे हे काम आता हातात घेत आहे असेही जरांगे म्हणाले.पण हे करत असताना आपल्या हक्काचे 40 ते 50 जण विधानसभेत निवडून गेले पाहीजेत. जे आपला आवाज विधानसभेत उठवतील. सध्या कोणीही आपला आवाज विधानसभेत नाही असेही जरांगे यावेळी म्हणाले. त्यामुळे चाळीस ते पन्नास जागा विधानसभेला मराठा मोर्चा तर्फे लढवल्या जातील असेच संकेत त्यांनी दिले आहे.  

'फडणवीसांकडून अडकवण्याचा प्रयत्न' 

एक जुने प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी उकरून काढले आहे. त्यात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. कोणत्याही प्रकरणात आपण अडकत नाही. शिवाय मॅनेजही होत नाही त्यामुळे हे प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. जुन्या प्रकरणात आपल्याला जामिन मिळाला आहे. तर सध्या तरी कोणती नोटीस मिळाली नाही असेही ते म्हणाले. फडणवीसांच्या हातात पोलिस आहेत. त्याचा गैरवापर केला जात आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचेही जरांगे यावेळी म्हणाले. फडणवीसांची ही जुनी सवय आहे. दुसऱ्याच्या गळ्यात फास आवळायला त्यांना आवडतं. पण जात काय असतं हे त्यांना दाखवून दिले जाईल असेही ते म्हणाले.   

Advertisement

जरांगेंचा फडणवीसांना इशारा 

जरांगे पाटील यांनी यावेळी फडणवीस 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किती मतांनी निवडून आले याचे गणितच सांगितले. फडणवीसांचे मताधिक्य जास्त नाही. 70 ते 80 हजार मतधिक्य आहे. तेवढे मराठी तर त्यांच्या मतदार संघात असतीलच असे सांगत, फडणवीसांनाही जरांगे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या टार्गेटवर आता फडणवीस आणि भाजप आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी तिव्र होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.   

उपोषणला दिली स्थगिती  

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. गेल्या पाच दिवसापासून ते उपोषणाला बसले होते. सरकारलाही त्यांनी आता नवा अल्टीमेटम दिला आहे. 13 ऑगस्टपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले आहे. तो पर्यंत आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाने एकी ठेवावी. आपल्यात फुट पडू देवू नका असे आवाहनही त्यांनी केले. 

Advertisement