Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर

Manoj Jarange Patil Morcha LIVE Update :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात आज (मंगळवार, 2 सप्टेंबर 2025) सकारात्मक चर्चा झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Manoj Jarange Patil Morcha LIVE Update :  मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमध्ये कशावर सहमती झाली? वाचा सविस्तर
मुंबई:

Manoj Jarange Patil Morcha LIVE Update :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात आज (मंगळवार, 2 सप्टेंबर 2025) सकारात्मक चर्चा झाली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या चर्चेनंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा 'जीआर' (GR) मिळाल्यास रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले आहे.

उपसमितीसोबत काय झाली चर्चा?

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचे संकेत जरांगे पाटील य़ांनी दिले. या दोघांमधील  चर्चेनंतर सरकारने तयार केलेल्या 'जीआर'चा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना वाचायला देण्यात आला. हा मसुदा अभ्यासकांना दाखवल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

चर्चेतील प्रमुख मुद्दे काय?

मराठा-कुणबी एकच: मराठा आणि कुणबी एकच असून या मागणीचा जीआर काढण्यासाठी सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

हैदराबाद गॅझेटियर: हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला उपसमितीने मान्यता दिली आहे.

सातारा गॅझेटियर: सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी एका महिन्यात केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. या प्रक्रियेत कायदेशीर बाबी तपासल्या जातील. शिवेंद्रराजे भोसले यांनी याची जबाबदारी घेतली असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

आंदोलकांवरील गुन्हे मागे: मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मागे घेण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार आहे.

बलिदान दिलेल्यांना मदत: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना एका आठवड्यात आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल, असे सरकारने सांगितले होते. नोकरीच्या पात्रतेत बदल करून महावितरण आणि MIDC मध्येही नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

Advertisement

इतर महत्त्वाचे निर्णय: 58 लाख नोंदींचे रेकॉर्ड ग्रामपंचायतींमध्ये लावले जाणार आहेत आणि जिल्हास्तरावर जातवैधतेची पडताळणी जलद गतीने होणार आहे.

( नक्की वाचा : Manoj Jarange Patil Morcha LIVE Update  : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंबंधी प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा )

मनोज जरांगे पाटील यांनी 'विजयी गुलाल उधळल्याशिवाय परत जाणार नाही,' असे स्पष्ट केले असले तरी, सरकारने जीआर काढल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. मात्र, सध्या उपोषण मागे घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.