Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये या घटनेचा उल्लेख करून आंदोलकांनी शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांकडून महिला पत्रकारांना धक्काबुक्की करणे, त्यांचे कपडे ओढणे आणि माईक हिसकावून घेणे असे प्रकार घडल्याची तक्रार अनेक पत्रकार संघटनांनी केली आहे.
नक्की वाचा : मराठा मोर्चामुळे मुंबईचा वेग मंदावला, कुठे कुठे वाहतूक कोंडी?
विजया रहाटकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे ?
"दिवस-रात्र पावसाची पर्वा न करता आपले काम करत असलेल्या पत्रकार आणि कॅमेरामन यांना अशा प्रकारचा त्रास देणे चुकीचे आहे," असे रहाटकर यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, आंदोलन करण्याचा हक्क सर्वांनाच आहे, पण त्याचबरोबर इतरांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेणेही गरजेचे आहे. महिला पत्रकारांना काम करताना होणारा हा त्रास गंभीर असून, तो टाळायला हवा.
जरांगेंची सूचना योग्य
रहाटकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आंदोलन करण्याचा हक्क आणि अधिकार सर्वांनाच आहे; पण त्याचबरोबर इतरांना कोणताही त्रास आणि मनस्ताप होणार नाही, याची काळजीदेखील घ्यावी लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना काळजी घेण्याबाबत वारंवार केलेली सूचना योग्य आहे. आंदोलकांनी त्यांच्या सूचनेचे पालन करून महिला पत्रकारांसह सर्वांनाच योग्य सन्मान दिला पाहिजे."