Massive Traffic Jam on Solapur-Dhule Highway: धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भक्तीचा असा काही महापूर लोटला आहे की, त्यामुळे सोलापूर-धुळे हायवेवर चक्क 40 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी तब्बल 15 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. या महाजामचे ड्रोन व्हिडिओ व्हायरल झाले असून, जिथे नजर जाईल तिथे फक्त वाहनांच्या रांगाच दिसत आहेत.
भक्तीचा ओघ आणि कोलमडलेली यंत्रणा
येडेश्वरी देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात साजरी केली जाते. यंदा 30 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत हा उत्सव सुरू आहे. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत.
15 लाखांहून अधिक जनसमुदाय एकाच वेळी रस्त्यावर उतरल्याने सोलापूर-धुळे या प्रमुख महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या गर्दीपुढे पोलीस आणि प्रशासनाचे सर्व नियोजन तोकडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
( नक्की वाचा : IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर )
40 किलोमीटर लांब रांगा आणि ड्रोन व्हिडिओ
या वाहतूक कोंडीची भीषणता ड्रोन कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसत आहे. महामार्गावर वाहनांच्या अंतहीन रांगा लागल्या असून गाड्या अक्षरशः रेंगाळत पुढे सरकत आहेत. सुमारे 40 किलोमीटरपर्यंत हे जाम पसरल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
ड्रोन व्हिडिओमध्ये मैलोन् मैल फक्त गाड्यांच्या छतांचा थर दिसत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे तासनतास जाममध्ये अडकलेल्या भाविकांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
व्हीआयपींनाही बसला फटका
या महाजामचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनाही (VIP) बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे एक मोठे नेतेही या जाममध्ये अडकले होते. त्यांना या महामार्गावर तब्बल 2 तास 30 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. प्रशासनाकडून हा जाम सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असले, तरी भाविकांचा ओघ इतका मोठा आहे की परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी बराच वेळ लागत आहे.
प्रशासनाने भाविकांना आणि प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पर्यायी मार्गांचा विचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञान आणि नियोजनाचा वापर करून हा 40 किलोमीटरचा विळखा सोडवण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.