गुरु दळवी, सिंधुदुर्ग:
Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: कोकण वासियांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतिक्षित बोटसेवा आजपासून( १ मार्च) सुरू होत आहे. या सेवेमुळे प्रवास जलद होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत. या रो रो सेवेमुळे सागरी वाहतुकीला चालना मिळणार आहे.
मुंबई- विजयदुर्ग रो रो सेवेला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई–विजयदुर्ग एम.टी.एम बोट फेरीचा अर्थात रो-रो जलवाहतूक सेवेला शुभेच्छा देत कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या च्या ट्विटला रि-ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी या बहुप्रतिक्षित सेवेच्या शुभारंभाचे स्वागत केले.आज
१ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान एम-टू-एम रो-पॅक्स फेरी सेवा अधिकृतपणे सुरू होत आहे.
या सेवेच्या माध्यमातून अवघ्या ६ ते ७ तासांत सागरी मार्गाने प्रवास शक्य होणार आहे. कोकणवासीयांना जलद, आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.बंदर विकास खात्याच्या माध्यमातून सुरू होत असलेली ही सेवा कोकण–मुंबई सागरी दळणवळणासाठी ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे.
मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांमुळे या प्रकल्पाचे राज्याच्या विकासदृष्टीनं असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. दरम्यान आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत या रोरो सेवा सेवेचा प्रारंभ होणार आहे.आज सकाळी आठ वाजता नितेश राणे भाऊचा धक्का येथून हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करणार आहेत.
कसे असेल वेळापत्रक आणि तिकीट दर?
मार्च महिन्यात या मार्गावर बोटीच्या एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत. मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी बोटी धावतील, तर विजयदुर्ग ते मुंबई या मार्गावर ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च रोजी बोट उपलब्ध असेल. या प्रवासासाठी इकॉनॉमीसाठी 2,500 रु, प्रिमीयम इकॉनॉमी 4,000, दुचाकी वाहन, 1,000 रु, सायकल, 600 रु, चारचाकी 6,000 रु. असे दर असतील.