निलेश बंगाले, वर्धा:
Wardha Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरुन भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वर्धा येथील समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने दोघांचा मृत्यू झाला तर पेटलेल्या ट्रकखाली कार अडकल्याने त्यामधील चौघांचा दुर्दैवी अंत झाला. या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समृद्धीवर भीषण अपघात, ६ जणांचा होरपळून मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना वर्धा हद्दीतील समृद्धी महामार्गावर घडली. वर्धा येथे समृद्धी महामार्गावर इथेनॉलच्या ट्रकचा अपघात झाल्याने तो महामार्गावर उभा होता, यावेळी वाहतूक वळवण्यात आली होती. अशातच पुण्याकडून वर्ध्याकडे येणाऱ्या एका कारने या ट्रकला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काही क्षणातच दोन्ही वाहनांना भीषण आगीने वेढले. या आगीत ट्रकचे चालक आणि क्लिनर यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, तर कारमधील चार प्रवाशांचाही आगीत अडकून जागीच मृत्यू झाला.
मृतकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सालोड गावच्या रहिवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोघा जुळ्या बहिणींचा समावेश असून त्या पुण्यामध्ये एडमिशन साठी गेल्या होत्या, मात्र रस्त्यातचं काळाने घात केला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अपघात इतका भयंकर होता की कार कापून मृतदेह बाहेर काढावे लागले.