राहुल तपासे, सातारा:
Satara ZP Election 2026: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची लगबग, बंडखोरी अन् उमेदवारीवरुन नाराजीनाट्यांना ऊत आला आहे. अशातच साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराने जिवंत मुलीला मृत दाखवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
साताऱ्यात भाजप उमेदवारावर गंभीर आरोप
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान जपाचे कराड तालुक्यातील सैदापूर गटातील उमेदवार सागर शिवदास यांना तीन अपत्य असल्याचा आक्षेप अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिनही मुली जिवंत असताना एका मुलीला मृत दाखवल्याचाही गंभीर आरोप जानराव यांनी केला आहे.
याप्रकरणी भाजप मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनावर दबाव टाकून निकाल फिरवल्याचा आरोप तक्रारदारांने आणि वकिलांनी केला आहे. आता तक्रारदाराने कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली असून सोमवारी 27 तारखेला मुंबई उच्च न्यायालयात सुनवणी होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचे राजकारण आता चांगलेच तापले आहे.
मंत्री जयकुमार गोरे, बावनकुळेंवर गंभीर आरोप
सागर भीमराव शिवदास यांना तीन अपत्ये आहेत. आम्ही याबाबत आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाली. सकाळच्या सत्रामध्ये भाजप उमेदवाराच्या वकिलाने आम्ही अर्ज अपात्र ठरल्यास दुसरा उमेदवार देऊ असे सांगितले. मात्र सायंकाळच्या सुनावणीत दोन नंबरचे अपत्य मृत झाल्याचा दावा करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निपक्षपातीपणाने निर्णय घेतला नाही. या सुनावणीचा निकाल फिरवण्यास मंत्री जयकुमार गोरे तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट हस्तक्षेप असल्याचा संशय अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
Solapur News : माढ्यात शरद पवारांच्या आमदाराचा फडणवीस पॅटर्न; भाजपाच्या प्रकल्पाचा भरसभेत प्रचार