सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Saibaba Temple : शिर्डीतील साईबाबा संस्थान संचालित साई प्रसादलयात रोज हजारो भाविक भोजन करतात. आता या प्रसादलायाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मद्यपान आणि धूम्रपान करुन भावीकांना भोजन कक्षात त्रास देणा-या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसादालयात टोकण पद्धत राबविण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. उद्या, गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 पासून सकाळी ह्या नियामाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
.... त्याशिवाय प्रसादालयात प्रवेश नाही !
साई दर्शनानंतर भावीकांना मोफत भोजन टोकण दिले देण्याची व्यवस्था करण्यात आली असून आता टोकण शिवाय प्रसादालयात प्रवेश मिळणार नाही. भाविकांच्या तक्रारी नंतर मोफत भोजन व्यवस्थे सुधारणा करण्यात आली असून अपप्रवृत्तीना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं.
शिर्डीत साईबाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे भोजनालय चालवले जाते.. याठिकाणी सर्वसाधारण हॉलमध्ये मोफत भोजन दिले जाते. दिवसाकाठी सरासरी येथे पन्नास हजार भावीक साई प्रसादाचा लाभ घेतात. मात्र त्याच बरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती, अमलीपदार्थांचे सेवन केलेली मंडळी, धुम्रपान करणारे काही व्यक्ती हे देखील प्रसादालयात प्रवेश करुन भोजन करतात तसेच यावेळी भाविकांना त्रास देखिल देत असल्याच्या तक्रारी संस्थानला प्राप्त झाल्या आहेत.
कशी असेल व्यवस्था?
भाविकांच्या तक्रारीनंतर आता साई संस्थानच्या वतीने प्रसादालय प्रवेशावर काही निर्बंध घालण्यात आले. साई मंदिरात दर्शन करुन बाहेर पडणा-या भाविकांना उदी -बुंदी प्रसादा बरोबरच साई प्रसादालयातील मोफत भोजनाचे टोकण दिले जाणार आहे.. तसेच ज्या भाविकांना अगोदर भोजन करायचे असेल त्यांना प्रसादालयातच मोफत भोजनाच टोकण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवास व्यवस्था, साईसंस्थानाच्या दोन्ही रुग्णालयातील पेशंट्स तसंच नातेवाईकांना देखील टोकण दिले जाणार असून शिर्डीत आलेला कोणताही भाविक उपाशी राहणार नाही याची दक्षता साई संस्थानच्या वतीने घेण्यात आल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : वडील आणि मुलासाठी काँग्रेस सोडावी लागणारे राधाकृष्ण विखे-पाटील भाजपाचे पॉवरफुल मंत्री कसे बनले? )
अलिकडेच साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घूण हत्या करण्यात आली त्यामुळे प्रशासन अॅक्शनमोड वर असून शिर्डीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाय योजना करत आहेत. त्याचबरोबर महिन्यापुर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत देशाभरातील लोक फुकट जेवायला येतात महाराष्ट्रातील भिकारी येथे जमा झाले आणि त्यामुळे येथील गुन्हेगारी वाढल्याच म्हटलं होतं
त्यानंतर साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करुन सशुल्क करावे अशी मागणी सुजय विखेंसह काही शिर्डीकरांनी केली असल्यानं आता टोकण पद्धत सुरु झाली असून या निर्णयाला सुजय विखे यांच्या त्या वक्तव्याशी देखील जोडलं जात असल्याचं दिसून येत आहे.