शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करू नये यासाठी सरकारने ही उपाय योजना केल्या आहेत. मात्र तरीही शेतकऱ्यांऱ्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. त्याचा सर्वाधिक फटका हा विदर्भातील शेतकऱ्याला बसत आहे. त्यातल्या त्यात पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलेल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणदे पश्चिम विदर्भात दर आठ तासाला एक शेतकरी आपलं जिवन संपवत आहे. ही आकडेवारी आता समोर आली आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर ही आकडेवारी समोर आल्याने विरोधक याबाबत आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.
पश्चिम विदर्भ म्हटला म्हणजे अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. याच जिल्ह्यात सध्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढत चाललं आहे. यंदा सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर पर्यंत तब्बल 527 शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. या जिल्ह्यात तब्बल 178 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अनेक कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत असा आरोप होत आहे. अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून 2025 या सहा महिन्यांच्या कालावधित तब्बल 527 शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. सरकारी आकडेवारीनुसार हे मृत्यू आहेत. नोंद न झालेल्यांची तर काहीच माहित समोर नाही. हे वास्तव बदलण्याचे आव्हान सरकार समोर आहे.
सन 2002 पासून शेतकरी आत्महत्या
- अमरावती जिल्हा : 5,477
- यवतमाळ जिल्हा : 6,351
- अकोला जिल्हा : 3,207
- वाशिम जिल्हा : 2,107
- बुलढाणा जिल्हा : 4,532
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात
जानेवारी ते जून पर्यंत झालेल्या आत्महत्या आकडेवारी
- अमरावती जिल्हा -101
- यवतमाळ जिल्हा -178
- अकोला जिल्हा -90
- बुलढाणा जिल्हा -91
- वाशिम जिल्हा -67