स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 28 मे रोजी जयंती असून या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळच्या भगूर इथे झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हयातीमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेसह अनेक यातना भोगल्या, मात्र प्रखर राष्ट्रवादी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या निश्चयापासून हटले नव्हते. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1966 साली प्रायोपवेशन करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजेच त्यांनी अन्न, पाणी, औषध घेणे सोडून दिले होते. 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव करत पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची महती सांगणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या अनादी मी अनंत मी या कवितेचे हिंदी भाषांतर करण्यात आले असून ते चालबद्धही करण्यात आले आहे. या गीताला महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे गाणे X वर पोस्ट करत, ते आवर्जून ऐकावे असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही X पोस्टद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाज्वल्य, हिंदुत्त्वाचे धगधगते अग्निकुंड, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!"