Shri Tuljabhawani Devi : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर मंदिर एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई म्हणूनही ओळखली जाते. येथील मंदीर हेमाडपंथी धाटणीचं आहे. पुरातत्व खात्यानुसार हे मंदीर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन असल्याचं मानलं जातं. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान पुरातत्त्व विभागाचे अधिकारी (Department of Archaeology), जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली मंदिराच्या गाभाऱ्याची पाहणी केली. यावेळी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या पूर्वीच्या वजनाच्या चारपट वजनाचा कळस बसविल्याने गाभाऱ्यातील शिळाना तडे गेल्याचं सांगितलं जात आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी यांनी आई तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे जाण्यामागील खरं कारण सांगितलं.
सध्या कुलस्वामिनी आईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. दररोज या मंदिरात 60-70 हजार भाविक भेट देतात. मंदिरात काही ठिकाण गळतीही सुरू होती. त्याशिवाय काही भागातील दगडाला तडे गेल्याचंही दिसून येत होतं. त्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त केली जात होती. यावेळी देवीच्या मंदिराच्या पूर्वीच्या वजनाच्या चारपट वजनाचा कळस बसविल्याने त्याचं वजन गाभाऱ्याच्या शिळांवर आला आणि त्याला तडे गेले असा खुलासा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसह मंदिराच्या गाभाऱ्याची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय व्यवस्थितपणे चालू असून भाविकांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही असेही सरनाईक यावेळी म्हणालेत.