Maharashtra Governer Jishnu Dev Varma: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जिष्णू वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह एकूण ९ राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या वर्मा यांच्या खांद्यावर आता महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, त्यांच्या जागी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या फेरबदलात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर बिहारच्या राज्यपालपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमध्ये लडाख आणि दिल्लीच्या उपराज्यपालांच्या पदांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. विनय कुमार सक्सेना यांची लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती झाली असून, दिल्लीच्या रिक्त जागी तरनजित सिंग संधू यांची वर्णी लागली आहे. हे सर्व बदल संबंधित व्यक्तींनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील. महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन राज्यपालांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय )
कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
जिष्णु देव वर्मा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते ३१ जुलै २०२४ पासून तेलंगणाचे ३रे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. देव वर्मा यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १९९३ मध्ये त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले. त्यांनी यापूर्वी २०१८-२३ पर्यंत त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे