सचिन झिटे, यवतमाळ: केंद्र सरकारच्या 'हर घर जल' योजनेचे ढोल वाजवले जात असतानाच योजनेतील फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. आर्णी तालुक्यातील कठोडा येथील पारधी वस्तीतील 12 वर्षांची वेदिका सुरेश चव्हाण हिला पाण्यासाठी नदीवर जावं लागलं आणि ती अरुणावती नदीत बुडून मरण पावली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्णी तालुक्यातील कठोडा येथे पारधी वस्तीमधील मुलीचा पाण्यासाठी नदीवर गेली असता बुडून मृत्यू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे वेदिका पाणी भरायला गेली असता पाय घसरून ती नदीत पडली. ही घटना समोर येताच परिसरात शोककळा पसरली. कठोडा गावाजवळील पारधी वस्तीत आजही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी रोज नदीकाठी जावं लागतं. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत कठोडा वस्तीचा समावेश असूनही, प्रत्यक्षात एकही घर पाण्याने जोडलेलं नाही.
नक्की वाचा - Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता
गावात फक्त एक हातपंप असून तोही अपुरा आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण आमच्या वस्तीपर्यंत पाणी आलंच नाही. मग हे पैसे गेले कुठे?” असा सवाल स्थानिक विचारत आहेत. वेदिकाचे नातेवाईक आणि गावकरी यामागे थेट प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत.
दरम्यान, आर्णी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या वस्तीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, एक निष्पाप जीव गमावल्यावर प्रशासनाला जाग येते, ही बाब दुर्दैवी आहे.
Nashik News : नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक