भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?

गुहागर मतदार संघ हा तसा भाजपचा गड मानला जात होता. पण या गडला भास्कर जाधव यांनी 2009 साली सुरूंग लावला.

Advertisement
Read Time: 4 mins
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच्या चर्चा सध्या गावागावात सुरू आहेत. इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात ही केली आहे. त्यातच बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातही तसेच काहीसे चित्र आहे. गुहागर मतदार संघ हा तसा भाजपचा गड मानला जात होता. पण या गडला भास्कर जाधव यांनी 2009 साली सुरूंग लावला. त्यानंतर सगल तीन वेळा त्यांनी हा मतदार संघ राखला आहे. जाधव आता शिवसेना ठाकरे गटात आहे. त्यांच्या विरोधात भाजपनं माजी आमदार डॉ. विनय नातू यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. तर भास्कर जाधव आपल्या मुलासाठीही या मतदार संघात चाचपणी करत आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुहागर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी गुहागर हा एक विधानसभा मतदार संघ. हा मतदार संघ हा तसा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. जनसंघापासून भाजपचा हा गड होता.  1978 आणि 1980 चा अपवाद वगळता या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहील आहे. डॉ. श्रीधर नातू यांनी हा मतदार संघ बांधला. नातू घराण्याचं भाजपच्या माध्यमातून या मतदार संघावर पकड राहीली आहे. 1978, 1985 आणि 1990 च्या निवडणुकीत डॉ. श्रीधर नातू विजयी झाले होते. तर 1993 च्या पोटनिवडणुकीत डॉ. विनय नातू पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 1995, 1999 आणि 2004 च्या निवडणुकीतही विनय नातू यांनीच बाजी मारत भाजपचा कोकणातला हा गड शाबूत ठेवला होता.  

Advertisement

2009 ला गडाला सुरूंग लागला 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला. तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यासाठी भाजपने हा मतदार संघ शिवसेनेसाठी सोडला. विद्यमान आमदार असतानाही विनय नातू यांना डावलण्यात आलं. नातू यांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर जाधव यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. भास्कर जाधव यांना 53 हजार 108 मतं पडली. तर रामदास कदम यांना 40 हजार 032 मतं पडली. भाजपचे असलेले पण अपक्ष म्हणून लढलेले डॉ. विनय नातू यांना 29 हजार 606 मतं पडली होती. त्यामुळे दोघांच्या भांडणात भास्कर जाधव यांचा विजय झाला होता. रामदास कदम आणि डॉ. विनय नातू या दोघांमध्ये शिवसेना-भाजपची मतं विभागल्याने राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना एकप्रकारे इथं लॉटरी लागली होती. 

Advertisement

भास्कर जाधवांचा गुहागरमध्ये दबदबा 
 

2009 ला या मतदार संघात भास्कर जाधव यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.  या मतदारसंघावर भास्कर जाधव यांची पकड मजबूत झाली आहे. दरम्यानच्या काळात  विनय नातू पुन्हा भाजपमध्ये परतले.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युती तुटली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची आघाडीही तुटली होती. त्यामुळी सर्वच पक्ष वेगवेगळे लढले. तेव्हाही भाजपकडून विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर जाधव, तर शिवसेनेकडून विजय भोसले, काँग्रेसकडून संदीप सावंत रिंगणात होते. त्यावेळीही भास्कर जाधव यांनी बाजी मारत नातू यांना धोबीपछाड दिला होता. 

Advertisement

जाधवांनी पक्ष सोडला मतदार संघ राखला 

2019 च्या विधानसभा निवडणुकी आधी भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.  तेव्हा शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळीही भाजपने एक पाऊल मागे घेत, भास्कर जाधव विद्यमान आमदार असल्याने मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला. भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे तेव्हा शिवसेनेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सहदेव बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. भास्कर जाधव आणि सहदेव बेटकर यांच्यात थेट लढत झाली. पण यावेळीही भास्कर जाधव यांनीच बाजी मारत या मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक केली. भास्कर जाधव यांना 78 हजार 748 तर, सहदेव बेटकर यांना 52 हजार 297 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विकास जाधव यांना 5069 मतं, मनसेच्या गणेश कदम यांना 2524 मतं, तर बसपाच्या उमेश पवार यांना 2009 मतं मिळाली होती. त्यामुळे जाधव यांनी पुन्हा आपली ताकद दाखवली.  

भास्कर जाधव मुलासाठी जागा सोडणार? 

गुहागर मतदार संघाची सर्व  राजकिय समिकरणं बदलली आहेत. या मतदारसंघातून उमेदवार म्हणून अनेक नावं समोर येत आहेत. या मतदारसंघातून भास्कर जाधव विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. भास्कर जाधव यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांचंही नाव चर्चेत होतं. भास्कर जाधव हे स्वत: चिपळूण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहेत. तर त्यांचा मुलगा गुहागरमधून नशिब आजमावेल अशी रणनितीही आखली जात आहे. तर जाधव पिता असो की पुत्र त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप डॉ. विनय नातू यांना पुन्हा रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. यासाठी नातू यांनी तयारी देखील सुरू केली आहे. तर शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी आमदार सदानंद चव्हाण यांचंही नाव चर्चेत होतं. पण विद्यमान आमदार भास्कर जाधव आणि डॉ. विनय नातू यांच्यामध्येच लढत होण्याची शक्यता आहे.