मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाल्यानंतर अशा घटनांना आळा बसेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. उलट या घटना वाढतच गेल्या आहे. त्याची स्पष्ट कबुली मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. महिलांवरील अत्याचार हे वाढले आहे. हे बरोबर आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी आता सरकारला काही तरी ठोस आणि कठोर पावलं उचलावी लागतील असं ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी एक नव्या कायद्याची गरज ही बोलून दाखवली आहे. हा कायदा असा आहे की ते ऐकून सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगड जिल्ह्यातील रोह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी आहे. तिच्या कुटुंबीयांची भेट मंत्री भरत गोगावले यांनी घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की, गुन्हेगारी ही वाढत चाललली आहे. हे बरोबर आहे. बदलापूर इथं जी घटना घडली त्यानंतर त्याचा जनक्षोभ दिसून आला. पुढे या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाला. त्यामुळे अशा गुन्हेगारांना जरब बसेल अशी शक्यता होता. पण तसं झालं नाही हे खरं आहे अशी स्पष्ट कबूली गोगावले यांनी दिली.
बदलापूर प्रकरणानंतरही तसेच सात ते आठ गुन्हे राज्यात झाले. नराधम सुधारतील असं वाटत होते पण ते काही सुधारले नाहीत. अशा वेळी बाहेरच्या देशात जसा कडक कायदा आहे तसा कायदा आणावा लागेल. असे काही गुन्हे बाहेरच्या देशात केले तर त्यांना ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केलं जातं. म्हणजेच जागेवरच त्यांना मृत्यूदंड दिला जातो. असे कडक कायदे आणायला पाहिजेत अशी स्थिती आहे असंही गोगावले यावेळी म्हणाले. अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्त दिवस समाजात वावरू देणं योग्य नाही असंही ते म्हणाले.
राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जे आरोपी आहेत त्यांनी पकडलं ही जात आहेत. पण अशा घटना थांबता थांबत नाही हे ही तितकेच खरे आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी अशा पद्धतीच्या कडक कायद्याची गरज बोलून दाखवली आहे. त्यामुळे महायुती सरकार खरोखर असा कायदा आणणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. असा कायदा आणला गेला तर तो ऐतिहासिक म्हणावा लागेल.