नरेंद्र मोदी यांची NDA च्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाली आहे. मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या लोकसभेत भारतीय जनता पार्टीला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे नव्या सरकारमध्ये तेलुगु देसम (TDP) आणि जनता दल युनायटेड (JDU) या NDA मधील दोन मोठ्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहेत. या पक्षांनी सरकार स्थापन होण्यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. तेलुगू देसमनंनं मुस्लीम आरक्षण हवेच असं स्पष्ट केलंय. भाजपाचा या आरक्षणाला ठाम विरोध आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तेलुगु देसमचे नेते आणि चंद्राबाबू नायडू यांचे पूत्र नारा लोकेश (Nara Lokesh) यांनी NDTV ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये मुस्लीम आरक्षणावर भूमिका स्पष्ट केलीय. मुस्लीम आरक्षण गेल्ंया दोन दशकांपासून सुरु आहे आणि ते पुढं सुरु राहावं अशीच आमची भूमिका आहे, असं लोकेश यांनी स्पष्ट केलं. लोकेश यांच्या टीडीपीनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 16 जागा जिंकल्या आहेत.
आरक्षण हा तृष्टीकरणाचा नाही तर अल्पसंख्याकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचा मार्ग आहे, असं लोकेश यांनी स्पष्ट केलं. 'अल्पसंख्यांकाचं दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना गरिबीतून बाहेर काढणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्हाला आपला देश विकसित करायचा असेल तर त्यांना मागं ठेवता कामा नये. आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे. त्याची सध्या चांगली संधी आहे. सर्वांनी एकत्र काम करणे ही टीडीपीची ओळख आहे, असं लोकेश यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय? )
तेलुगु देसम पक्षानं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तसंच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय. आंध्र प्रदेशात त्यांचा पक्ष सत्तेत परतलाय. पक्षाच्या या कामगिरीत लोकेश यांचं मोलाचं योगदान आहे. चंद्राबाबू नायडू यांना अटक केल्यानंतर लोकेश यांनी पक्षाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी त्या काळात नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी 4,000 किलोमीटर पदयात्रा काढली होती.
चंद्राबाबू नायडू यांना अटकेनंतर 52 दिवस तुरुंगात होते, ते सूडबुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप लोकेश यांनी केला. 'आम्ही सुडाच्या राजकारणाचे बळी आहोत. कायदा सर्वांना समान आहे.आपल्या देशात सूडबुद्धीच्या राजकारणाला कोणतीही जागा नाही, असं लोकेश यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना )
टीडीपीनं लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. टीडीपी कधीही पदासाठी बोलणी करत नाही. आम्ही नेहमी राज्याला मिळणाऱ्या निधीबाबत बोलणी करतो. आम्ही मंत्रालय मागत नाही. राज्याच्या हितामध्येच आम्हाला रस आहे, असं लोकेशनं सांगितलं.