'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं

Eknath Khadse : भाजपा प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे, असं साकडं बाप्पाला घातलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

भाजपा प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे, असं साकडं बाप्पाला घातलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरमधील घरी बाप्पाची विधीवत स्थापना झाली. त्यानंतर बोलताना खडसे यांनी ही भावना व्यक्त केली. 

फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त झाली असून त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आलं पाहिजे असं साकडं, बाप्पाला घातलं असल्याचं खडसे यांनी सांगितलं. भाजपामध्ये माझा प्रवेश होईल अशी आशा असल्यामुळे सहा महिने मी स्तब्ध होतो मात्र आता वारंवार माध्यमां समोर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.  महाराष्ट्रात राजकीय स्थिती फारशी चांगली नाही. महागाईनं त्रस्त झालेली जनता आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भाजपा नेत्यांवर आरोप

यापूर्वी खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजपामधील प्रवेश रखडल्याचा आरोप केला होता. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आपला भाजपा प्रवेश झाला होतो. तो नड्डा यांनी जाहीर करायला हवा होता. पण फडणवीस आणि महाजन यांनी विरोध केल्यानं भाजपामध्ये प्रवेश झाला नाही. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघं जेपी नड्डा यांच्यापेक्षा मोठे असल्याची खोचक टीका खडसे यांनी केली होती. 

भाजपला मोठा करण्यात गेल्या 40 वर्षापासून माझं मोठे योगदान मात्र मेहनत घेणाऱ्यांना बाजूला टाकलं जातं. नवख्यांना मोठं केलं जातं हा कुठला न्याय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्याचवेळी भाजपालाच माझी गरज नाही तर मी भाजपामध्ये का जाऊ? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

Advertisement

( नक्की वाचा : एकनाथ खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कधी होणार? बावनकुळेंनी दिलं उत्तर )
 

खडसेंची राजकीय कारकिर्द

महाराष्ट्र भाजपातील जुने नेते असलेले एकनाथ खडसे फडणवीस सरकारच्या काळात नाराज होते. त्यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन होते असा खडसे यांचा आरोप होता. त्यामुळे पक्षात राहून त्यांनी वारंवार फडणवीस आणि महाजन यांना लक्ष्य केलं होतं. शेवटी त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

खडसे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवरही पाठवले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. आपला पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचारही केला होता. पण त्यांचा पक्षप्रवेश काही झाला नाही. त्यामुळे खडसे आता पुन्हा नाराज झाले आहेत.  
 

Advertisement
Topics mentioned in this article