भाजपचे जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी, महाराष्ट्राचे राज्यपालही बदलले

बागडे यांच्या रूपाने छत्रपती संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे. तर सी.पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बागडे यांच्या रूपाने छत्रपती संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे. बागडे हे भाजपचे कट्टर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सह अन्य राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीही राष्ट्रपतींनी घोषीत केल्या आहेत. या शिवाय महाराष्ट्राचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत. सी.पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील.  

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हरिभाऊ बागडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले आहे. यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944 रोजी झाला. राज्यात भाजप बाळसे धरत असताना 1985 मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले. 1995 साली राज्यात युतीचे सरकार आले होते. त्या सरकारमध्ये हरिभाऊ बागडे हे रोहयो मंत्री होते. 2009 मध्ये मात्र त्यांचा फुलंब्री विधानसभा मतदार संघातून पराभव झाला होता. मात्र 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला. 2014 साली त्यांना विधानसभेचे अध्यक्षही करण्यात आले. सध्या ते विद्यमान आमदारही आहेत. त्यांच्यावर आता नवी जबाबदारी असणार आहे. ते राजस्थानचे राज्यपाल ही असतील. 

ट्रेंडिंग बातमी - NITI Aayog Meeting : कोकणाचे पाणी वापरून मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपवण्याबाबत चर्चा

दरम्यान भारताच्या राष्ट्रपतींनी बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा स्वीकारला आहे. त्याच बरोबर अन्य नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. त्यात  जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय भाजपचे जेष्ठ नेते ओम प्रकाश माथूर यांची ही सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे, तर रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

महाराष्ट्राचे राज्यपालही बदलण्यात आली आहे.  सी.पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. त्यांच्यावर तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार ही होता. आता त्यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे आता नवे राज्यपाल असतील.  त्याच बरोबर गुलाब चंद कटारिया यांच्यावर पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आता आसामचे राज्यपाल असतील.

Advertisement

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांमधेय तिन राज्यामध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहे. त्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.