Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ही चर्चा पुन्हा सुरु झाली. आपण मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं होतं. पण, अजूनही याबाबतची चर्चा संपलेली नाही. त्यातच जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही, असं सांगितल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. अखेर जयंत पाटील यांनी स्वत:च याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले जयंत पाटील?

शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर मोर्चा आज (बुधवार, 12 मार्च 2025) काढण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या सभेत जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार सतेज पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचं आवाहन केलं. 

Advertisement

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, 'आमचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही बोलायचं हळहळू कमी झालोय. कारण, बोलून लोकांना काही समजत नाही. गंभीर प्रश्नांपेक्षा इतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी प्रसार माध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहेत. पण, तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल. राजू शेट्टी यांनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझं काही खरं नाही.'

( नक्की वाचा : Exclusive : 'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....' जयंत पाटलांची कबुली! )
 

अखेर दिलं स्पष्टीकरण

आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ निघत असल्याचं लक्षात येताच जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. आपण हे वक्तव्य राजू शेट्टी यांच्या संदर्भात केलं असल्याचा दावा पाटील यांनी केला. आम्ही शेट्टी यांना आमच्या बाजूनं उभा रहा असं सांगत होतो. आता राजू शेट्टी यांनी मोर्चा आणला तेव्हा त्यासंदर्भात बोलताना तुमचा माझ्यावर भरोसा नाही, असं म्हणालो. तेव्हा मी माझं काही खरं नाही, असं बोललो. त्याचा संदर्भ वेगळा होता, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. 
 

Topics mentioned in this article