- शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत पक्षाला रामराम केले होता
- शेखर सुमन यांनी सांगितले की तेव्हा त्यांच्या आयुष्यातील दबावामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता
- भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकारण हे क्षेत्र त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे जाणवले आणि त्यांनी पक्ष सोडला
सिने जगतातील अनेक लोकांनी राजकारणात प्रवेश केला. काहींना राजकारण मानवलं. तर काहींनी राजकारणाला कायमचा रामराम केला. अभिनेत्याचं नेता होणं त्यांच्या पचनी पडलं नाही. पण काही निर्णय हे सर्वांनाच चक्रावून टाकतात. प्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक शेखर सुमन यांनी ही एकेकाळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या 24 तासांत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. हे फार कमी लोकांना माहित असेल. पण त्यांनी असं केलं होतं. आता अनेक वर्षांनंतर शेखर सुमन यांनी असा निर्णय घेण्या मागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
शेखर सुमन यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणतात त्या काळात त्यांच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडल्या होत्या, ज्यामुळे ते स्वतःला अत्यंत अडचणीत असल्याचं समजत होते. त्यांना एका कोपऱ्यात ढकलल्यासारखे वाटत होते. आपण एकाकी आहोत अशी त्यांची स्थिती झाली होती. याच दबावाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता असं त्यांनी सांगितलं. हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला नव्हता असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर तत्कालीन परिस्थितीचा तो एक परिणाम होता.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत शेखर सुमन यांना आपलं काही तरी चुकलं आहे अशी जाणीव झाली. राजकारण हे काही आपल्या आवाक्यातील नाही. हे क्षेत्र आपल्यासाठी नाही हे त्यांना उमगले. तेथील वातावरणाशी ते स्वतःला जुळवून घेऊ शकले नाहीत. म्हणूनच, कोणताही दिखावा न करता त्यांनी तात्काळ पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चोविस तासात घेतला. विक्रमी वेळत एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने पक्ष जॉईन केला आणि तेवढ्याच वेगात त्याने राजीनामा ही दिला.
राजकारणात जरी शेखर सुमन स्थिरावू शकले नाहीत तरी त्यांचे राजकारण्यांशी चांगले संबंध होते. त्यात ही ते ज्येष्ठ नेत्यांच्या जवळचे होते. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक आठवणीतील किस्सा सांगितला आहे. एकदा एका कार्यक्रमादरम्यान अटलजींनी शेखर सुमन यांना पाहून आपला ताफा थांबवला होता. गाडीतून उतरून त्यांनी शेखर यांना मिठी मारली आणि म्हटले, "तुझा शो असाच सुरू राहू दे. जेव्हा तू माझी नक्कल करतोस, तेव्हा मला सर्वात जास्त हसू येते." हा क्षण आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याचे शेखर सुमन यांनी सांगितले.