- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केले
- पाकिस्तानने जर आगामी T20 विश्वचषकातून माघार घेतली तर ICC कडून त्यांच्यावर कडक बंदी घालण्याची शक्यता आहे
- पाकिस्तान क्रिकेट आणि आसीसीमधील वाद टोकाला गेला आहे
Angry ICC Puts Mohsin Naqvi On Notice: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी लाहोरमधील पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कमालीची आक्रमक झाली आहे. पाकिस्तानने जर आगामी विश्वचषकातून माघार घेतली किंवा आडमुठी भूमिका कायम ठेवली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आयसीसीने दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत पाकिस्तानवर पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकते.
नकवींची धमकी आणि आयसीसीची भूमिका
मोहसीन नकवी यांनी म्हटले होते की, "आम्ही विश्वचषकात खेळायचे की नाही, याचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल." त्यांनी बांगलादेशच्या मुद्द्यावरूनही आयसीसीवर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. मात्र, आयसीसीने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या मतदानात पाकिस्तान आणि बांगलादेश एकाकी पडले असून, 14 विरुद्ध केवळ 2 मते त्यांना मिळाली आहेत. बांगलादेशला विश्वचषकातून बाहेर करून स्कॉटलंडला संधी मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संताप अनावर झाला आहे.
पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये खेळले नाही तर...
- जर पाकिस्तानने T20 विश्वचषकातून माघार घेतली, तर आयसीसी खालील कठोर पावले उचलू शकते
- पाकिस्तानला जागतिक क्रिकेटमधून निलंबित केले जाईल.
- कोणत्याही देशासोबत द्विपक्षीय मालिका (Bilateral Series) खेळता येणार नाही.
- आशिया चषकातून पाकिस्तानची हकालपट्टी केली जाईल.
- पाकिस्तानची स्थानिक लीग PSL साठी कोणत्याही परदेशी खेळाडूला NOC मिळणार नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या अविचाराने घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट आता धोक्याच्या छायेत आहे. आयसीसीने स्पष्ट केले आहे की, खेळापेक्षा राजकारण मोठे करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला जागतिक क्रिकेट नकाशावरून पुसले जाईल. बांगलादेशच्या मुद्द्यावरून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पाकिस्तानला आता इतर देशांचा पाठिंबा मिळेनासा झाला आहे. जर त्यांनी विश्वचषकावर बहिष्कार टाकला, तर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.