IND vs NZ 2nd ODI: विराट कोहली आणि रोहित शर्माची मोठी खेळी पाहण्यासाठी बुधवारी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. लाखो क्रिकेट फॅन्सचं लक्षही या दिग्गज जोडीवर होतं. पण, हे दोघं मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे निराश झालेल्या क्रिकेट फॅन्सना केएल राहुलनं झुंजार सेंच्युरी करत खुश केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या वन-डे मध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली. त्यानंतर राहुलनं संपूर्ण इनिंगचा भार खांद्यावर वाहात अविस्मरणीय सेंच्युरी झळकावली. राहुलच्या या खेळीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आलीच, पण त्याने भारताच्या एका माजी कॅप्टनचा रेकॉर्डही मोडला आहे.
कमाल लाजवाब (KL) राहुल
राहुलनं राजकोट वन-डेमध्ये सेंच्युरी करताच माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनला मागे टाकले. अझरनं त्याच्या 334 सामन्यांच्या प्रदीर्घ वनडे कारकिर्दीत 7 सेंच्युरी झळकावल्या होत्या. राहुलने फक्त 93 व्या वनडे सामन्यातच अझरला मागे टाकलंय. आता राहुलच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये एकूण 8 सेंच्युरी आहेत. कठीण प्रसंगी संघासाठी धावून येण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे त्याने पुन्हा एकदा क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.
राजकोटमध्ये इतिहास रचणारा पहिला भारतीय
केएल राहुलने या सामन्यात आणखी एक खास पराक्रम केला आहे. राजकोटच्या या मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी शिखर धवन येथे शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण त्याचे शतक अवघ्या काही रननी हुकले होते. राहुलने मात्र ही संधी सोडली नाही आणि 92 बॉलमध्ये नाबाद 112 रनची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीत 11 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता.
( नक्की वाचा : Sarfaraz Khan : 6,4,6,4...सर्फराज खाननं फक्त 15 बॉलमध्ये केला ऐतिहासिक रेकॉर्ड, अभिषेक शर्माची काढली हवा! )
जडेजा आणि रेड्डी यांची साथ
भारताची अवस्था एकवेळ बिकट झाली होती. शुभमन गिलचा अपवाद वगळता कोणताही टॉप ऑर्डरचा बॅटर 30 रनचा टप्पा पार करू शकला नव्हता. विराट कोहली सुद्धा 23 रनवर बाद झाला. अशा स्थितीत राहुलने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 73 रनची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. खेळपट्टी फिरकीला साथ देत असतानाही त्याने आपला संयम ढळू दिला नाही. शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याने गिअर बदलला आणि न्यूझीलंडच्या बॉलर्सचा समाचार घेत भारताला 50 ओव्हर्समध्ये 7 बाद 284 पर्यंत पोहोचवले.
या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी स्कोअर 322 रन आहे, त्या तुलनेत भारताची धावसंख्या थोडी कमी वाटते. पण खेळपट्टीचा रंग पाहता 285 रनचे लक्ष्य गाठणे न्यूझीलंडसाठी सोपे नसेल. भारताला ही मालिका जिंकण्यासाठी आता अचूक बॉलिंग करावी लागेल.