भारताने शनिवारपासून (17 मे) बांगलादेशमधून येणाऱ्या काही वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेडीमेड कपडे आणि प्रोसेस्ड फूड आयटम्स (प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ) यांचा समावेश आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT) ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, बांगलादेशहून भारतात येणाऱ्या रेडीमेड कपडे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांसारख्या काही वस्तूंवर बंदर निर्बंध लावण्यात आले आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान DGFT ने लागू केलेले हे निर्बंध तत्काळ प्रभावाने अंमलात आणण्यात आले आहेत. बांगलादेशातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या रेडीमेड गारमेंट्सच्या आयातीसाठी कोणत्याही लँड पोर्टवरून आता परवानगी दिली जाणार नाही. DGFT च्या अधिसूचनेनुसार, अशा आयातीस केवळ नाव्हाशेवा (Jawaharlal Nehru Port) आणि कोलकाता बंदरांद्वारेच परवानगी मिळेल.
नक्की वाचा - PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन?
कशाकशावर निर्बंध?
वाणिज्य व उद्योग मंत्रालयानुसार, तत्काळ प्रभावाने फळे/फळांच्या चवीचे कार्बोनेटेड ड्रिंक्स, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, कापूस व कापसाचे सुती धाग्याचे कचरा (Cotton Yarn Waste), प्लास्टिक आणि PVC चे पूर्ण झालेले उत्पादने, रंग (dyes) आणि लाकडी फर्निचर यांची आयात आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम येथील कोणत्याही लँड कस्टम स्टेशन/इंटिग्रेटेड चेक पोस्ट तसेच पश्चिम बंगालमधील चांग्राबंधा आणि फुलबाडी लँड कस्टम स्टेशन यांद्वारे करता येणार नाही.
या वस्तूंवर निर्बंध नाही...
DGFT च्या अधिसूचनेनुसार, मच्छी, एलपीजी, खाद्यतेल आणि क्रश्ड स्टोन यांसारख्या वस्तूंवर हे बंदर निर्बंध लागू होणार नाहीत.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बंदरावरील निर्बंध भारतामार्गे नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंना लागू होणार नाहीत.