ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला अनेक बाजूंनी घेरले आहे. यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वॉटर स्ट्राईक. भारताने पाकिस्तानसोबतची सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द केला आहे. हा करार रद्द करताना भारतानं एक प्रभावी रणनीती आखली आहे ती आता यशस्वी होताना दिसत आहे.
पाकिस्तानच्या इंडस रिव्हर सिस्टम अथॉरिटी (IRSA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 21% पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. याचा परिणाम येत्या काळात पिकांच्या उत्पादनावर दिसून येईल. पाकिस्तानातील पाण्याची कमतरता भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भयंकर दुष्काळ येणार आहे का? पाकिस्तानला थेंब थेंब पाण्यासाठी तडफडावे लागणार आहे का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पाकिस्तानमधील सद्यस्थिती
पाकिस्तानच्या इंडस रिव्हर सिस्टम अथॉरिटी (IRSA) च्या ताज्या आकडेवारीनुसार:
सध्या पाकिस्तानमध्ये पाण्याची एकूण 21% टंचाई आहे, ज्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार निश्चित आहे.
पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील संपूर्ण सिंचन व्यवस्था सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे, जी झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांमधून पाणी मिळवते.
मे ते सप्टेंबर या काळात चालणाऱ्या खरीप हंगामाच्या पेरणीवर याचा थेट परिणाम झाला आहे.
भारताकडून चिनाब नदीतील पाणी पुरवठा कमी केल्यामुळे पाकिस्तानच्या कृषी व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.
खरीप पिकांसाठी पाकिस्तानात पाणी जवळजवळ नगण्य आहे.
दोन अत्यंत महत्त्वाच्या धरणांमधील पाणी कमी झाले आहे. यात झेलमवरील मंगला धरण आणि सिंधूवरील तरबेला धरणाचा समावेश आहे.
पाण्याची उपलब्धता घटली
पाकिस्तान सरकारने आज (2 जून 2025) जारी केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, पंजाब प्रांतातील सिंधू नदी प्रणालीमध्ये (पाकिस्तानमध्ये) पाण्याची उपलब्धता 2 जून 2024 च्या तुलनेत 10% कमी झाली आहे. पाकिस्तानमध्ये महत्त्वाच्या खरीप पिकांची पेरणी सुरू आहे, त्याचवेळी पाण्याची लक्षणीय घट झाली आहे.
पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण (IRSA) नुसार, जे पाकिस्तानमधील सिंधू नदी प्रणालीमध्ये पाण्याचे वितरण व्यवस्थापित करण्यासाठी जल नियामक म्हणून कार्य करते, 2 जून 2025 पर्यंत पंजाब प्रांतातील पाण्याची एकूण उपलब्धता केवळ 1,28,800 क्युसेक होती! आज जारी करण्यात आलेल्या IRSA च्या ताज्या "दैनिक जल स्थिती" अहवालानुसार, गेल्या वर्षी 2 जून 2024 रोजी पंजाब प्रांतातील सिंधू नदी प्रणालीतील पाण्याची उपलब्धता 1,43,600 क्युसेक होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10.30% घट झाल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे.
पंजाब प्रांतातील सिंधू नदी प्रणालीतील पाण्याची ही महत्त्वपूर्ण घट शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट बातमी आहे, कारण सध्या खरीप पिकांची पेरणी सुरू आहे. नैऋत्य मान्सून या महिन्याच्या शेवटीच पंजाब प्रांतात पोहोचण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, पुढील चार आठवड्यांत पाण्याची उपलब्धता आणखी कमी होईल, ज्यामुळे प्रांतात खरीप पिकांच्या पेरणीसाठी पाण्याची उपलब्धता आणखी मर्यादित होईल.
पाकिस्तानला काय भोगावे लागणार?
खरीप पिकांचे मोठे नुकसान
पंजाब-सिंधमध्ये मोठे नुकसान.
जलविद्युत उत्पादनात घट.
वीजेसाठी हाहाकार माजेल.
शाहबाज शरीफ यांना टेन्शन
देशातील जलसंकटाने त्रस्त झालेले पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ताजिकिस्तानमध्ये भारताच्या पावलांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत पाणी रोखून परिस्थिती आणखी बिघडवत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' ने शरीफ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'सिंधू बेसिनमधील पाण्याच्या वाटपाचे नियमन करणाऱ्या सिंधू जल कराराला स्थगित ठेवण्याचा भारताचा एकतर्फी आणि अवैध निर्णय अत्यंत खेदजनक आहे.'
सिंधू जल करारानुसार भारताला रावी, बियास, सतलज यांसारख्या पूर्वेकडील नद्यांवर पूर्ण अधिकार आहे, तर पश्चिमेकडील नद्या म्हणजेच झेलम, चेनाब आणि सिंधूच्या पाण्यावर मर्यादित अधिकार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार निलंबित केला आहे. भारताने पाकिस्तानसोबत पाण्याचा प्रवाह संबंधित कोणताही डेटा सामायिक करणे बंद केले आहे.