Why India Never Buys American Fighter Jets?: सध्या संपूर्ण जगाचं लक्ष पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धावर आहे. या भागात अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांचं युद्ध सुरु आहे. या युद्धाची झळ फक्त इराण आणि इस्रायल नाही तर पश्चिम आशियासह संपूर्ण जगाला बसतीय. या भागात अमेरिकेची सर्वात घातक आणि आधुनिक लढाऊ विमाने रात्रंदिवस घोंघावत आहेत. अण्वस्त्रवाहू एफ/ए-18 सुपर हॉर्नेट असो किंवा रडारलाही चकवा देणारे एफ-22 रॅप्टर स्टील्थ फायटर, ही विमाने सध्या तिथे आपली ताकद दाखवत आहेत.
इतकेच नाही तर एफ-35 या विमानाने पहिल्यांदाच हवेतल्या हवेत शत्रूचे विमान पाडण्याचा पराक्रमही करून दाखवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या 20 वर्षांत अमेरिकेने ही सर्व विमाने भारताला विकण्याची तयारी दाखवली होती. मात्र, प्रत्येक वेळी भारताने या जबरदस्त विमानांना नकार दिला. जगातील सर्वात शक्तिशाली विमान आपल्या ताफ्यात असावे असे प्रत्येक देशाला वाटते, मग भारतच का याला नकार देतोय? यामागे एक मोठे ऐतिहासिक रहस्य दडलेले आहे.
भारताचा सर्वात मोठा आक्षेप
भारताच्या अमेरिकेवरील नाराजीचा इतिहास हा शीतयुद्धाच्या काळात सुरु होतो. त्यावेळी अमेरिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारत आजही सावध आहे. अमेरिकेने तेंव्हा पाकिस्तानला केवळ साधी शस्त्रे दिली नाहीत, तर त्यांची सर्वात प्रगत लढाऊ विमानेही पुरवली. यामध्ये एफ-86 सेबर, एफ-104 स्टारफायटर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एफ-16 फायटिंग फाल्कन या विमानांचा समावेश होता.
ही तीच विमाने होती, जी पाकिस्तानने थेट भारताच्या विरोधात युद्धाच्या मैदानात वापरली. आपल्या शत्रूच्या हातात अमेरिकन शस्त्रे पाहून भारताचा अमेरिकेवरील विश्वास उडाला आणि तिथूनच भारताने आपलं धोरण बदललं.
( नक्की वाचा : Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं? )
रशियाची साथ आणि अमेरिकेचे कठोर निर्बंध
अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतल्यामुळे भारताने रशियाकडे मदतीचा हात मागितला. भारताने रशियाकडून मिग-21, मिग-29 आणि सुखोई-30 एमकेआय सारखी विमाने घेतली, जी आजही भारतीय हवाई दलाचे मुख्य बळ आहेत. पुढे 1990 च्या काळात भारत आणि अमेरिकेचे संबंध थोडे सुधारू लागले होते, पण 1998 मध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला.
भारताने जेव्हा पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी केली, तेव्हा अमेरिकेने भारतावर कडक आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादले. भारताला मिळणारे सर्व अमेरिकन तंत्रज्ञान एका रात्रीत थांबवण्यात आले. या घटनेने भारताची खात्री पटली की, संकटकाळी अमेरिका कधीही त्यांचा पुरवठा थांबवू शकते.
( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )
इतर सर्व काही घेतले, पण फायटर जेट्सना मात्र प्रवेश नाही
आता भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री पूर्वीपेक्षा घट्ट झाली आहे. भारताने अमेरिकेकडून अब्जावधी रुपये खर्च करून सी-17 ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट विमान, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, चिनूक हेलिकॉप्टर आणि प्रीडेटर ड्रोन खरेदी केले आहेत. लष्करी साहित्यासाठी भारत आता अमेरिकेचा मोठा ग्राहक आहे.
तरीही, जेव्हा लढाऊ विमानांचा (फायटर जेट्स) प्रश्न येतो, तेव्हा भारत आजही अमेरिकेला लांबच ठेवतो. कारण साध्या ट्रान्सपोर्ट विमानांचे सुटे भाग थांबले तरी चालतील, पण युद्धाच्या वेळी जर लढाऊ विमानांचे सुटे भाग अमेरिकेने थांबवले, तर भारताची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ही जुनी भीती आणि अविश्वास आजही भारताच्या मनात कायम आहे.