स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा संपली! पाकिस्तानातून आलेल्या 54 सिंधी भाषिकांना मिळालं भारतीय नागरिकत्व

राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "विभाजन विभाषिका स्मृती दिवस" सिंधी भवन येथे साजरा करण्यात आला.

Advertisement
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, उल्हासनगर

विभाजनाच्या जखमांवर फुंकर घालत पाकिस्तानातून आलेल्या 54 सिंधी हिंदूंनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर भारताच्या कुशीत आश्रय घेतला आहे. 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं आहे. उल्हासनगरातील सिंधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात या नव भारतीयांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त करताना "आता आम्ही आणि आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित आहोत," असे उद्गार काढले.

राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "विभाजन विभाषिका स्मृती दिवस" सिंधी भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी नव भारतीयांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पाकिस्तानातील अत्याचारांची कहाणी उलगडली गेली. 

"भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे," असं सांगताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रकाश देवानी, अनित कुमार आसानी आणि दिलीप हुंदलानी यांसारख्या नव भारतीयांनी पाकिस्तानातील जाचक जीवनाची कहाणी रेखाटली. त्यांनी सांगितलं की, "पाकिस्तानात अल्पसंख्याकांना सतत छळ, खंडणी, आणि धर्मांतराचा त्रास सहन करावा लागतो. हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं.

"भारतीय सिंधू सभा नावाच्या संघटनेने या सिंधी भाषिकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, नवीन CAA कायद्यामुळे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या 150 लोकांपैकी 54 जणांना केवळ तीन महिन्यांत नागरिकत्व मिळालं आहे. उर्वरित अर्ज प्रलंबित असून, त्यांनाही लवकरच भारतीय नागरिकत्व मिळण्याची आशा आहे. पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीतून सुटलेल्या या हिंदूंसाठी आता भारतात एक नवा संसार सुरू झाला आहे.

Topics mentioned in this article