50 फुट विहिरीत पडलेल्या अस्वलाला 10 तासानंतर बाहेर काढण्यात यश

विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्वलाने पाइप फोडले. त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला. पण अस्वल हुलकावणी देत होते.

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

अमोल गावंडे

बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत अस्वल पडले होते.  याची माहिती आरएफओ चेतन राठोड यांना मिळताच ते वन्यजीव आणि प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. शनिवारी रात्री जवळपास 10 तासाच्या अथक प्रयत्नाने अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. या अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ एका शेतातील कठडे नसलेल्या 50 फूट खोल विहिरीत अस्वल पडले होते. ही बाब सायंकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन्यजीव विभागाला माहिती दिली. वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. परंतु, तोपर्यंत अंधार झाला होता. विहिरीत जवळपास 10 फूट पाणी असल्याने अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे आरएफओ चेतन राठोड यांनी अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते.

हेही वाचा - निकाला आधीच धुसफूस वाढली, भाजपमंत्र्याचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्वलाने पाइप फोडले. त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला. पण अस्वल हुलकावणी देत होते. लाकडी शिडी तयार करून ती विहिरीत टाकली तरीही अस्वल बाहेर येत नव्हते. शेवटी दोरीची शिडी विहिरीत टाकण्यात आली. त्याच्या मदतीने सकाळी 5 वाजेच्या सुमारास अस्वल विहिरीतून सुखरूप बाहेर आले. त्यानंतर ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. अस्वलाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.

Advertisement