बदलापूर प्रकरण: अक्षय शिंदेच्या वडिलांचे अमित शहांना पत्र, पत्रात काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना ही पत्र पाठवले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. त्यानंतर त्याच्या एन्काऊंटर वरून न्यायालयाने अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्याच्या एन्काऊंटरनंतर काही ठिकाणी जल्लोष झाला तर काहींनी टिकाही केली. अक्षयवर अंत्यसंस्कार कुठे करायचे यावरूनही वाद सुरू आहे. त्याचा मृतदेह बदलापूरमध्ये दफन करण्यासाठी विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहीले आहे. या पत्राची आता सर्वत्र चर्चा आहे. या पत्रातून अक्षयच्या वडिलांनी अमित शहा यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. तळोजा कारागृहातून ठाण्याला नेताना मुंब्रा बायपास जवळ त्याचा एन्काऊंटर झाला. पोलिसांची बंदूक हिसकावून घेवून त्याने गोळाबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन मुंबईच्या जेजे रूग्णालयात करण्यात आले. त्याचा एन्काऊंटर झाल्यानंतर अनेक ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला. बदलापूर पिडीत मुलींना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. मात्र या एन्काऊंटरवर अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी संशय व्यक्त करत उच्च न्यायालयात धाव घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले

अक्षयचा एन्काऊंटर नाही तर तो पोलिसांनी नियोजनबद्ध केलेला खून आहे असा आरोप अक्षयच्या आई वडिलांनी केला. या याचिकेवरील सुनावणी वेळी कोर्टाने ही पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे मारत अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात संस्था चालक मात्र प्रकरणानंतर फरार आहेत. त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. अशात आता अक्षयच्या वडिलांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहीले आहे. त्या पत्रात त्यांनी आमच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमच्या वकिलाच्या जिवालाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी या पत्रात सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावे अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना ही पत्र पाठवत ही मागणी केली आहे. अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यानंतर  त्याच्या पालकांच्या जिवाला कोणा पासून धोका आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय त्यांची कोर्टात लावून धरणारे वकील ही कोणाच्या रडारवर आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या या पत्रावर आता गृह मंत्रालय काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे.