- ए मेरे वतन के लोगों या गाण्याचे मूळ गायन आशा भोसले यांनी करायचे ठरले होते, असे मितुल प्रदीप यांनी सांगितले
- लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यात या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान मतभेद निर्माण झाले होते, ज्यामुळे वाद झाला
- सुरुवातीला संगीतकार सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेदांमुळे हे गाणे आशा भोसले गाणार होत्या.
जीतेंद्र दीक्षित
'ए मेरे वतन के लोगों...' हे अमर गीत ऐकले की आजही डोळे पाणावतात. कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे अजरामर झाले. मात्र, हे गाणे मूळतः लतादीदींनी नाही, तर आशा भोसले यांनी गायचे ठरले होते, असा खुलासा कवी प्रदीप यांची मुलगी मितुल प्रदीप यांनी केला होता. भारतीय संगीताच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेल्या 'ए मेरे वतन के लोगों' या गाण्यामागे एक नाट्यमय वळण दडलेले आहे. कवी प्रदीप यांची कन्या मितुल प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्याच्या राईट्स आणि गायकीवरून लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. सुरुवातीला सी. रामचंद्र यांच्यासोबतच्या वादामुळे लतादीदी हे गाणे गाणार नव्हत्या, परंतु प्रदीप यांच्या आग्रहाखातर त्या तयार झाल्या. रेकॉर्डिंगच्या दिवशी आशा भोसले यांचे रडत स्टुडिओबाहेर जाणे, हे आजही संगीत क्षेत्राला न सुटलेलं कोडं आहे.
गाण्याची निर्मिती होत असताना संगीतकार सी. रामचंद्र (चितळकर काका) आणि लता मंगेशकर यांच्यात काही कारणास्तव मतभेद होते. त्यामुळे हे गाणे आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचे ठरले. आशाताईंनी गाण्याची तालीमही सुरू केली होती. मात्र, कवी प्रदीप यांना हे गाणे लतादीदींच्याच आवाजात हवे होते. त्यांनी मध्यस्थी करून लतादीदींची मनधरणी केली आणि त्या गाण्यासाठी तयार झाल्या. मात्र या मुळे संगीतकारांसमोर पेच निर्माण झाला, कारण आशाताईंनी आधीच सराव केला होता. शेवटी दोन्ही बहिणींनी मिळून हे गाणे गावे असे ठरले. रेकॉर्डिंगच्या दिवशी लतादीदी आणि आशाताई स्टुडिओत पोहोचल्या. गाण्यापूर्वी एका बंद खोलीत दोन्ही बहिणींमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर आशा भोसले रडत स्टुडिओबाहेर पडल्या आणि थेट घरी निघून गेल्या.
आशाताई निघून गेल्यावर हे गाणे केवळ लता मंगेशकर यांनी गायले. त्या दिवशी त्या खोलीत नक्की काय घडले आणि दोन्ही बहिणींमध्ये कोणत्या विषयावर वाद झाला, हे आजही एक गुपितच आहे. या गाण्याने पुढे इतिहास घडवला आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांतही पाणी आणले.कवि प्रदीप यांची मुलगी मितुल यांनी NDTV बरोबर बोलताना या गाण्याबाबत मोठा खुलासा केला होता. त्यांनीच सांगितलं की हे गाणं आधी आशा ताई गाणार होत्या. मात्र दोन्ही बहीणींमध्ये या गाण्याच्या रेकॉर्डींग वेळी काही तरी बिनसलं असं ही त्यांनी सांगितलं आहे. मात्र त्या बंद खोलीत काय झालं हे अजून ही समोर येवू शकलेलं नाही.