- सूरज कसबे, प्रतिनिधी
Ashadhi Wari 2026: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. सोहळ्याचा प्रचंड उत्साह असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे वारकऱ्यांना पवित्र स्नानासाठी नदीपात्रात उतरण्यास प्रशासनाकडून पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीने धारण केले रौद्ररूप
दरवर्षी आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2026) प्रस्थान करताना लाखो वारकरी देहूत येऊन पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. हे स्नान वारीच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. मात्र यावर्षी परिसरात आणि घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने नदीकाठचा परिसर हायअलर्टवर ठेवला आहे.
(नक्की वाचा: Pandharpur Wari: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी; राज्य सरकारचा निर्णय)
नदीकाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
वारकऱ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून देहूतील इंद्रायणी नदी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नदीपात्राकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलिसांकडून वारकऱ्यांना नदीत न उतरण्याचे आवाहन केले जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस मित्र, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक प्रशासन 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन
पालखी सोहळ्याच्या उत्साहात वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, जेणेकरून हा सोहळा सुरक्षित आणि आनंदाच्या वातावरणात पार पडेल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.