सूरज कसबे, पतिनिधी
Scholarship Latest News : महिलांना कोअर अभियांत्रिकी क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी बजाज ऑटो लिमिटेडची सामाजिक उत्तरदायित्व संस्था असलेल्या बजाज ऑटो फाउंडेशनने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.फाउंडेशनने पुढील दहा वर्षांत तब्बल 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.रूपा राहुल बजाज स्कॉलरशिप फॉर विमेन इन इंजिनिअरिंग या देशातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
या उपक्रमांतर्गत मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स,रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स यांसारख्या कोअर इंजिनिअरिंग शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी बजाज ऑटोच्या मुख्यालयात आयोजित सोहळ्यात या शिष्यवृत्तीच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आणि आयआयटी व एनआयटी यांसारख्या देशातील आघाडीच्या 40 संस्थांमधील पहिल्या तुकडीच्या 506 गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
8 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येणार
या कार्यक्रमाला बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजुमदार-शॉ आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज प्रामुख्याने उपस्थित होते.या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणा दरम्यान 8 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल.ज्यामुळे त्यांना आर्थिक विवंचनेशिवाय आपले शिक्षण पूर्ण करता येईल.केवळ आर्थिक साहाय्य करण्यापुरतीच ही योजना मर्यादित नसून,यामध्ये विद्यार्थिनींना व्यावसायिक मार्गदर्शन,नेतृत्वगुण विकास आणि थेट औद्योगिक अनुभवाची संधी देखील दिली जाणार आहे.
नक्की वाचा >> Electric Car: पहिल्यांदाच हायब्रिड लूकमध्ये दिसणार सर्वांची आवडती 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये करणार 400 km पार
राजीव बजाज नेमकं काय म्हणाले?
या प्रसंगी बोलताना राजीव बजाज यांनी स्पष्ट केले की, महिलांमधील संयम आणि चिकाटी हे गुण अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अत्यंत पूरक आहेत.गेल्या दशकभरात बजाज ऑटोच्या कारखान्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण जवळपास 20 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून यामुळे कंपनीच्या प्रगतीला मोठी गती मिळाली आहे. किरण मजुमदार-शॉ यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, विज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे ही भारताच्या आर्थिक विकासासाठी काळाची गरज आहे. जिथे कौशल्य,तिथे मार्ग हे नवीन ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेला बजाज फाउंडेशनचा हा उपक्रम भविष्यात भारतातील महिला अभियंत्यांची एक सक्षम पिढी घडवण्यास मैलाचा दगड ठरणार असे म्हटले आहे.